Sharad Pawar | राज्यातील महापालिका निवडणुकांचा प्रचार संपून आता मतदानाला अवघा एक दिवस उरलेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठा राजकीय धक्का बसला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षांतरांचे सत्र सुरू असतानाच शरद पवार यांचे खंदे समर्थक आणि जुने सहकारी मानले जाणारे माजी आमदार रमेश कदम यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मतदानाच्या अगदी तोंडावर घडलेल्या या घडामोडीमुळे शरद पवार गटाची चिंता वाढली आहे. (Ramesh Kadam resigns)
महापालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्ष बदलल्याचं चित्र गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले अनेक जण इतर पक्षांच्या वाटेने गेले. अशाच वातावरणात आता राष्ट्रवादी शरद पवार गटातील एक निष्ठावंत नेता बाहेर पडल्याने हा पक्षासाठी मोठा झटका मानला जात आहे.
रमेश कदमांचा राजीनामा, पक्षात नाराजीचा सूर :
शरद पवार यांचे विश्वासू मानले जाणारे माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे सादर केल्याची माहिती समोर आली आहे. चिपळूण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर रमेश कदम नाराज होते, अशी चर्चा आहे. पक्षात आपल्याला योग्य स्थान आणि अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे.
विशेष म्हणजे, 1984 पासून रमेश कदम राष्ट्रवादी चळवळीशी जोडलेले होते. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीतील अनेक बडे नेते शरद पवार यांची साथ सोडून गेले होते. मात्र त्या काळात रमेश कदम यांनी शरद पवार यांच्याशी निष्ठा कायम ठेवली होती. त्यामुळे त्यांचा आजचा राजीनामा हा शरद पवार यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
Sharad Pawar | निवडणुकांच्या घोषणांनंतर राजकीय हालचालींना वेग :
दरम्यान, मंगळवारी निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा केली आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान, तर 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या घोषणेनंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, अनेक ठिकाणी नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. अशाच पार्श्वभूमीवर रमेश कदम यांच्या राजीनाम्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. (NCP Sharad Pawar faction)
महापालिका निवडणुकीच्या निकालापूर्वीच पक्षाला बसलेला हा धक्का शरद पवार गटासाठी किती महागात पडतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मतदानाच्या एक दिवस आधी घडलेल्या या घडामोडीचा मतदारांवर काय परिणाम होतो, हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.






