Hema Malini | महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीबाबत सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली होती. यालाच आता अभिनेत्री तथा भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
हेमा मालिनी यांचं वक्तव्य चर्चेत
हेमा मालिनी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या प्रयागराज येथे जाऊन पवित्र स्नान करणार आहेत. जर परिस्थिती व्यवस्थापित झाली नसती, तर पंतप्रधान तेथे गेले असते का?” असा सवाल त्यांनी केला आहे.
“अखिलेश यादव नेहमीच चुकीचे बोलतात”
अखिलेश यादव यांनी महाकुंभातील चेंगराचेंगरी आणि मृतांच्या संख्येवरून प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, हेमा मालिनी यांनी हे आरोप फेटाळून लावत सांगितले की, “अखिलेश यादव नेहमीच चुकीचे बोलतात. काही घटना घडल्या असतील, पण त्याचा विपर्यास केला जात आहे.”
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अखिलेश यादव यांनी सरकारला सवाल विचारले होते. त्यांनी महाकुंभातील चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूंबाबत सरकारच्या जबाबदारीवर प्रश्न उपस्थित करत घटनास्थळी योग्य नियोजन झाले नव्हते, असा आरोप केला.
हेमा मालिनी यांनी मात्र महाकुंभातील परिस्थिती नियंत्रणात असून, सरकारने योग्य प्रकारे व्यवस्था केली आहे, असा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, “घटना घडली असली तरी ती मोठी नाही, त्यामुळे विरोधकांनी अनावश्यक टीका करू नये.”
Title : Hema Malini on Mahakumbh stampede case






