Pandharpur | आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर (Pandharpur) शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी तपासणी मोहीम राबवली आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन हॉटेल्सचे व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. वारकऱ्यांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
217 आस्थापनांची तपासणी; तीन हॉटेल्सवर कारवाई :
अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई (Sahebrao Desai) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील 217 खाद्य आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत हॉटेल्स, मिठाई दुकाने, फरसाण केंद्रे, खानावळी आणि प्रसाद विक्री करणाऱ्या दुकानांचा समावेश होता. तपासणीदरम्यान विविध खाद्यपदार्थांचे एकूण 172 नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
तपासणीदरम्यान अनियमितता आढळल्यामुळे मंगलमूर्ती मिसळ व भेळ, हॉटेल स्वरा अँड चायनीज सेंटर आणि हॉटेल श्री विष्णू सहस्रनाम या तीन आस्थापनांना तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले. या तिन्ही आस्थापनांचे व्यवसाय परवानेही निलंबित करण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
Pandharpur | वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी विशेष मोहीम
आषाढी एकादशीनिमित्त देशभरातून लाखो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होत असल्याने प्रशासनाने अन्न सुरक्षेबाबत विशेष खबरदारी घेतली आहे. भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे किंवा अस्वच्छ पद्धतीने तयार केलेले अन्न वारकऱ्यांच्या आरोग्यास धोका ठरू नये यासाठी अन्नपदार्थांची साठवणूक, स्वच्छता, वापरले जाणारे तेल, कृत्रिम रंग तसेच इतर घटकांची गुणवत्ता तपासली जात आहे. सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी ही विशेष तपासणी मोहीम 14 जुलै 2026 पर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगितले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे.
तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार भविष्यातही अशा तपासण्या सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हॉटेल व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा नियमांचे पालन करावे, परिसर स्वच्छ ठेवावा आणि ग्राहकांना मोफत शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अन्नाच्या दर्जाबाबत कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी 18002223635 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रशासनाने म्हटले आहे.






