Ajit Pawar | बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज पहिल्यांदाच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. त्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. मात्र, या दौऱ्यादरम्यान त्यांनी राजकीय बांधणीसाठीही महत्त्वाची पावले उचलल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या दोन आमदारांना या निर्णयाने धक्का दिला गेला असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
नव्या नियुक्त्यांमुळे जुन्या नेत्यांना धक्का
अजित पवारांच्या नेतृत्वाखालील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. नियोजन समितीवर विधीमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित करण्यासाठी राष्ट्रवादी कोट्यातून गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित आणि भाजप कोट्यातून केजच्या आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, यामुळे भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांना संधी नाकारण्यात आली. हा निर्णय जुन्या नेत्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
राजकीय समीकरणे बदलणार?
महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातील सर्व नियोजन समित्यांवरील नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली होती. त्यामुळे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी वगळता इतर सदस्यांची जागा रिकामी होती. आता नव्याने झालेल्या या नियुक्त्यांमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा थेट फटका धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक असलेल्या आमदारांना बसल्याचे बोलले जात आहे. (Ajit Pawar)
“खंडणी मागू नका, अन्यथा मकोका लागेल”
पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात आलेल्या अजित पवार यांचे कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात मोठ्या उत्साहात स्वागत केले. मात्र, आपल्या पहिल्याच दौऱ्यात त्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला.
“विकासकामे करताना कुणीही खंडणी मागू नये, अन्यथा मकोका लावायला मागेपुढे पाहणार नाही,” असा थेट इशारा त्यांनी दिला. तसेच, पक्षातील कुणीही अनुचित वागणूक दिली तर ती सहन केली जाणार नाही, असेही ते (Ajit Pawar) म्हणाले.






