Zilla Parishad Election 2026 | महापालिका निवडणुकांचा सावळा गोंधळ अजूनही पूर्णपणे संपलेला नसतानाच आता जिल्हा परिषद निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यातील राजकीय वातावरण सध्या प्रचंड तापलेले असून, निष्ठावंतांचा संताप, आक्रोश आणि बंडखोरीची चर्चा सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषद म्हणजेच मिनी मंत्रालयाच्या निवडणुकांबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणूक कधी होणार आणि आचारसंहिता नेमकी कधी लागू होणार, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. (ZP Election 2026)
कोरेगाव-भीमा येथील 208 व्या शौर्यदिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असताना अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रशासनाच्या तयारीबाबत माहिती दिली आणि थंडीचे वातावरण असतानाही चांगल्या प्रकारची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले. दुपारनंतर गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त करतानाच त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात सूचक विधान केले, ज्यामुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लवकरच? :
अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, सध्या राज्यात महानगरपालिकेची आचारसंहिता सुरू आहे. ही आचारसंहिता संपल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. म्हणजेच महापालिका निवडणुका झाल्यानंतर लगेचच जिल्हा परिषद निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. मात्र, आचारसंहिता लागू करण्याचा अंतिम अधिकार निवडणूक आयोगाकडे असून, याबाबतचा निर्णय आयोगच घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आचारसंहितेमुळे विकासकामांमध्ये कोणतीही अडचण येऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच राज्यातील विविध भागांमधील जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्हा परिषदांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण आहे. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आरक्षण 50 टक्क्यांच्या आत ठेवणे बंधनकारक आहे. त्यामुळे ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण 50 टक्क्यांच्या आत आहे, तिथे निवडणुका आधी घेतल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. (Zilla Parishad Election 2026)
युती, जागावाटप आणि तिकीट वाटपावर भाष्य :
याच वेळी अजित पवार यांनी युती आणि जागावाटपावरही भूमिका मांडली. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे निवडणूक लढवण्याची शक्यता असून, याबाबत उदय सामंत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Ajit Pawar Statement)
तिकीट वाटपाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने कोणत्याही गुन्हेगाराला तिकीट दिलेले नाही. युतीमध्ये ज्या पक्षाला ज्या जागा देण्यात आल्या आहेत, त्या जागांवर उमेदवार देण्याचा अधिकार संबंधित पक्षाचा आहे. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रभागातील जागावाटपाचा तिढा सुटेल, असेही त्यांनी सांगितले. शेवटच्या क्षणापर्यंत काही ठिकाणी गोंधळाचे वातावरण होते, मात्र आता हळूहळू परिस्थिती स्पष्ट होत असल्याचा दावा त्यांनी केला.






