Yogi Adityanath | उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित महाकुंभमेळ्यासाठी योगी सरकारने मोठा खर्च केला असून, यावरून राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांकडून या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी या खर्चाविषयी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
महाकुंभमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फायदा – योगी आदित्यनाथ
शुक्रवारी, लखनौ येथे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) आणि नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या उपस्थितीत उत्तर प्रदेश सरकारने ११४ पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभमेळ्याच्या आयोजनावर आणि खर्चावर भाष्य केले.
त्यांनी सांगितले की, “दर सहा वर्षांनी कुंभ आणि दर १२ वर्षांनी महाकुंभ आयोजित करण्याची संधी मिळते. अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे उत्तर प्रदेशच्या पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळते. विशेष म्हणजे, या महाकुंभमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला ३ लाख कोटी रुपयांचा फायदा होणार आहे.”
१५०० कोटी रुपये महाकुंभसाठी, उर्वरित निधी शहराच्या विकासासाठी
विरोधकांनी महाकुंभवर ५०००-६००० कोटी रुपये खर्च झाल्याचा आरोप केला होता. मात्र, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की, “महाकुंभसाठी केवळ १५०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. उर्वरित निधी प्रयागराज शहराच्या नूतनीकरणासाठी वापरण्यात आला आहे. जर या खर्चामुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला ३ लाख कोटी रुपयांची चालना मिळत असेल, तर हा खर्च योग्यच आहे.” (Yogi Adityanath)
योगी आदित्यनाथ यांनी पुढे सांगितले की, “महाकुंभदरम्यान जवळपास ५०-५५ कोटी भाविक येथे येतील. त्यामुळे राज्याच्या पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. तसेच, आमचे डबल इंजिन सरकार सत्तेत आल्यापासून ज्या ठिकाणी भाविक पूर्वी जाऊ शकत नव्हते, तिथे आता निर्भयपणे जाता येते.”
महाकुंभमेळ्याच्या खर्चावरून राजकीय वाद सुरू असतानाच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आता विरोधक या उत्तराने संतुष्ट होतील की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Title : Yogi Adityanath Justifies Maha Kumbh Expenses






