Weather Update | कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामानात झपाट्याने बदल होत असून, मुसळधार पावसाचा आणि चक्रीवादळाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे मासेमारी करणाऱ्या बोटींना किनाऱ्यावर आणले गेले असून, आंबा-काजू बागायतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चक्रीवादळाचा धोका; मासेमारी थांबवली
कोकण किनारपट्टीपासून महाराष्ट्राच्या मध्य भागापर्यंत हवामानात मोठा बदल जाणवत असून, जोरदार वाऱ्यांसह वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने (IMD) जारी केला आहे. केरळपासून महाराष्ट्रापर्यंत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे. कोकणातील मिरकरवाडा, जयगड, साखरतर, नाटे, हर्णे, जाकादेवी आदी बंदरांवरील बोटी समुद्रातून परत आणण्यात आल्या आहेत.
गेल्या चार ते पाच दिवसांत कोकणातील काही भागांत (Weather Update) जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे आंबा आणि काजूच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाल्याने शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर मच्छिमारांनी मासेमारी थांबवली असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व बोटी किनाऱ्यावर उभ्या केल्या आहेत.
एप्रिलमध्ये हवामानाचा तडाखा-
हवामान (Weather Update) तज्ज्ञ सुप्रीत कुमार यांच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रातील तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात दिवसाचं तापमान 42 ते 44 अंशांच्या दरम्यान पोहोचत आहे. नागपूर, अकोला, वर्धा, ब्रह्मपुरी, अमरावती याठिकाणी अत्यधिक तापमानाची नोंद झाली आहे.
30 मार्च रोजी कर्नाटक समुद्रात सरकणाऱ्या चक्रीवादळामुळे कोकणात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिवसाच्या वेळेस उष्णता आणि रात्री तापमानात घट अशा प्रकारचं हवामान असल्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस गुढीपाडवा होत असून, त्यानंतर हवामान अधिक अस्थिर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






