Weather Update | महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज अनेक ठिकाणी पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली असली, तरी राज्यातील काही भागांत पाऊस सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील २४ तासांसाठी रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे, या भागांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे, कारण जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
24 तासांकरिता मुसळधार पाऊस-
हवामान विभागाने (Weather Update) वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांकरिता या पाच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यात ८३.४ मिमी पावसाची सर्वाधिक नोंद झाली आहे. त्याखालोखाल ठाणे जिल्ह्यात ७३.७ मिमी, मुंबई शहर ६२.९ मिमी, रायगड ५४.१ मिमी आणि पालघर जिल्ह्यात ४९.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कुठे-किती पावसाची नोंद?
राज्यात कालपासून (Weather Update) आज १७ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे ७३.७, रायगड ५४.१, रत्नागिरी ४७.७, सिंधुदुर्ग १२.७, पालघर ४९.७, नाशिक ७.७, धुळे ७.१, नंदुरबार ४, जळगाव ६.७, अहिल्यानगर १.१, पुणे ११.९, सोलापूर ०.९, सातारा १९.७, सांगली ६, कोल्हापूर १७.८, छत्रपती संभाजीनगर ०.६, जालना ०.१, बीड ०.७, लातूर ०.१, धाराशिव १.६, नांदेड ३.६, परभणी १.७, हिंगोली ३.६, बुलढाणा ३.५, अकोला ८.७, वाशिम ८.५, अमरावती ९.४, यवतमाळ ८.७, वर्धा ७.६, नागपूर ०.९, गोंदिया ०.२, चंद्रपूर ११.९ आणि गडचिरोली जिल्ह्यात ५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जगबुडी नदी इशारा पातळीवर, वाहतूक विस्कळीत-
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर वाहत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी येथे मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील वळंजवडी येथे महामार्गावर १०० मीटर परिसरात भेगा पडल्याने या महामार्गावरील वाहतूक सध्या एकेरी मार्गावरून सुरू आहे, ज्यामुळे वाहतुकीची गती मंदावली आहे.
सातारा जिल्ह्यातील पाटण-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीसाठी केलेला पर्यायी रस्ता पाण्याखाली जाऊन खचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. दुचाकी व चारचाकी वाहतूक नेरळे-माणगाव-मणेरी-चाफेर-संगमनगर धक्का मार्गे कोयनानगर अशी वळवण्यात आली आहे, ज्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे.






