NEET Paper Leak | संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नीट (NEET) पेपर लीक प्रकरणावर प्रथमच सविस्तर भूमिका मांडली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणा उभारली जाईल, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दोषींवर कठोर कारवाईचा सरकारचा इशारा :
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीनंतर किरेन रिजिजू यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, पंतप्रधानांनी नीट पेपर लीक प्रकरण गांभीर्याने घेतले असून सरकार विद्यार्थ्यांच्या हिताबाबत अत्यंत संवेदनशील आहे. या प्रकरणात आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे. फेरपरीक्षा घेण्यात आली असून निकाल जाहीर करण्यात कोणताही विलंब झालेला नाही. यापुढे अशा प्रकारचे पेपर लीक होऊ नयेत यासाठी पूर्णपणे सक्षम आणि सुरक्षित प्रणाली विकसित करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही बैठकीत नमूद करण्यात आले.
पंतप्रधानांनी या प्रकरणातील दोषींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची भूमिका स्पष्ट केली. हा केवळ एका राज्यापुरता मर्यादित विषय नसून संपूर्ण देशाशी संबंधित प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या संवेदनशील मुद्द्यावर पक्षीय राजकारण होऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. बैठकीत मुक्त व्यापार करार (Free Trade Agreement) या विषयावरही चर्चा झाली असून शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल आणि त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, असे मार्गदर्शन पंतप्रधानांनी केल्याचे रिजिजू यांनी सांगितले. तसेच मागील महिन्यात देशाने मिळवलेल्या विविध यशस्वी कामगिरीचाही बैठकीत उल्लेख करण्यात आला.
NEET Paper Leak | आंदोलनादरम्यान तणावाचे वातावरण :
नीट पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ राजधानी दिल्ली (Delhi) येथील जंतर-मंतर (Jantar Mantar) परिसरात मागील महिनाभर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे नेतृत्व कॉकरोच जनता पार्टी (Cockroach Janata Party) चे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijit Dipke) करत असून आंदोलनाला विविध विरोधी पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. संसदेच्या अधिवेशनादरम्यान राजधानीतील वातावरण अधिक तणावपूर्ण बनले असून विद्यार्थ्यांनी संसदेकडे मोर्चा काढला. या दरम्यान काही ठिकाणी हिंसाचार झाल्याची माहिती समोर आली आहे.
मोर्चादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. या कारवाईत 78 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले, तर सुमारे 118 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. काही आंदोलकांनाही दुखापत झाली. संसदेकडे जाणाऱ्या मोर्चाला सुमारे 150 मीटर अंतरावर अडवण्यात आले होते. त्यानंतर आंदोलकांनी पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती आणखी चिघळल्याचे सांगण्यात आले.






