Sadabhau Khot | दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान शेतकरी नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. आंदोलकांना दहशतवाद्यांची उपमा दिल्याचा आरोप होत असून, आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्यांना दहशतवादी ठरवले जात असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला.
विद्यार्थ्यांनी व्यक्त केला तीव्र निषेध :
कॉकरोच जनता पार्टीच्या (Cockroach Janata Party) नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या काही विद्यार्थ्यांनी सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सरकारवरही निशाणा साधला. आंदोलनात सहभागी झालेली तरुण मंडळी ग्रामीण भागातील असून ती देशभरातून शिक्षणाच्या प्रश्नासाठी एकत्र आल्याचे त्यांनी सांगितले. अशा विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणे चुकीचे असून सरकारविरोधात बोलणाऱ्या प्रत्येकाला अशा प्रकारची उपमा दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
विद्यार्थ्यांनी पुढे बोलताना सदाभाऊ खोत यांना कोणालाही देशद्रोही किंवा दहशतवादी ठरवण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले. लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नसल्याची टीकाही त्यांनी केली. निवडणुकीत मत मागणारे नेते आता आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच लक्ष्य करत असल्याचा आरोप करत संबंधित आमदारांना जनतेसमोर उत्तर द्यावे लागेल, असा इशाराही आंदोलकांनी दिला.
Sadabhau Khot | शांततापूर्ण आंदोलनाचा दावा :
सदाभाऊ खोत यांनी लोकशाही मार्गाने अशा आंदोलनांना उत्तर देण्याची भूमिका मांडत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांचा राजीनामा घेऊ नये, अशी मागणी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना एका आंदोलकाने सांगितले की, देशभरातून आलेले विद्यार्थी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते. जर त्यांचा उद्देश हिंसक असता, तर सकाळीच बॅरिकेड्स तोडून पुढे गेले असते. मात्र त्यांनी दुपारपर्यंत शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन केले, त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला.
आंदोलनात सहभागी झालेल्या आणखी एका विद्यार्थ्याने लोकशाहीच्या मूल्यांचा उल्लेख करत सांगितले की, आंदोलनावेळी त्यांच्या एका हातात पुस्तक आणि दुसऱ्या हातात गुलाबाचे फूल होते. त्याउलट पोलिसांकडे लाठ्या आणि रायफल होत्या, असा दावा त्याने केला. आम्ही अहिंसेच्या मार्गावर विश्वास ठेवतो, कोणावरही हल्ला करण्याचा किंवा हिंसाचार घडवून आणण्याचा आमचा हेतू नाही. शांतता आणि लोकशाहीच्या चौकटीत राहूनच आम्ही शिक्षणाच्या प्रश्नावर लढत आहोत, असेही आंदोलकांनी स्पष्ट केले.






