Waqf Amendment Bill l आज संसदेत मांडल्या जाणाऱ्या वक्फ दुरुस्ती विधेयकावरून देशभरात खळबळ निर्माण झाली आहे. विशेषतः मुस्लिमबहुल भागांमध्ये या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून महाराष्ट्रासह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री किरण रिजीजू आज हे विधेयक लोकसभेत मांडणार आहेत. यावर तब्बल 8 तास चर्चा होणार असून, भाजप आणि एनडीएच्या इतर नेत्यांचा सहभाग राहणार आहे. जगदंबिका पाल, अनुराग ठाकूर, रवी शंकर प्रसाद, निशिकांत दुबे, सुधांशु त्रिवेदी, भागवत कराड आदी खासदार या चर्चेत आपली मते मांडणार आहेत.
मुंबईसह राज्यातील संवेदनशील भागांमध्ये वाढीव बंदोबस्त :
विधेयकावर चर्चा सुरू असताना कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून मुंबई, पुणे, औरंगाबाद, मालेगाव, भिवंडी, जळगाव, परभणी यासारख्या मुस्लिमबहुल भागांमध्ये पोलिसांचा वाढीव बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस विभागाने सर्व यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असून, काही ठिकाणी ड्रोनद्वारे देखील नजर ठेवली जाणार आहे.
काल रात्रीपासूनच काही संवेदनशील भागांमध्ये पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. आज दिवसभर या भागांमध्ये गस्त वाढवण्यात येणार आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील विविध युनिट्सना परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश दिले गेले आहेत.
Waqf Amendment Bill l इतर राज्यांमध्येही सावधगिरी :
उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही सुरक्षा यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. संबंधित राज्यांच्या पोलीस विभागांनी कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.
एनडीए सरकारकडून हे विधेयक अत्यंत नियोजित पद्धतीने मांडण्यात येणार आहे. लोकसभेत भाजप खासदारांना 4 तासांचा वेळ देण्यात आला आहे, तर मित्रपक्षांना फक्त 40 मिनिटे दिली जाणार आहेत. त्यामुळे विरोधकांचा आवाज कितपत प्रभावी राहील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, या विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र वाद होण्याची शक्यता असून, त्याचा प्रत्यक्ष परिणाम रस्त्यावरील आंदोलने, निषेध आणि पोलीस कारवाईवर दिसून येऊ शकतो. दुपारनंतर या विधेयकावर निर्णय घेतला जाईल, आणि त्यानंतर देशभरातील वातावरणात काय बदल होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






