Lata Mangeshkar | भारतरत्न लता मंगेशकर यांनी आपल्या अलौकिक आवाजाने भारतीय संगीत क्षेत्रात एक अमिट स्थान निर्माण केले. ३६ हून अधिक भाषांमध्ये गाणी गाऊन त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
1989 साली त्यांना प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने (Dadasaheb Phalke Award) सन्मानित करण्यात आले. लंडनच्या (London) रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये (Royal Albert Hall) सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय गायिका ठरल्या.
अनेक सन्मान, पण वैयक्तिक आयुष्य राहिले अपूर्ण
लता मंगेशकर यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले, पण त्यांनी लग्न केले नाही. आयुष्यभर अविवाहित राहण्याचा निर्णय त्यांनी का घेतला, हा प्रश्न अनेकांना पडतो. या निर्णयामागे त्यांची कौटुंबिक जबाबदारी आणि प्रेम हे प्रमुख कारण होते.
भावंडांसाठी वाहिलेले आयुष्य
लहान वयातच वडिलांचे छत्र हरपल्याने, लतादीदींवर कुटुंबाची मोठी जबाबदारी आली. आईसोबत मिळून त्यांनी आपल्या चार भावंडांचा – मीना, आशा, उषा आणि हृदयनाथ – सांभाळ केला. या भावंडांचे शिक्षण आणि त्यांच्या कला क्षेत्रातील कारकिर्दीसाठी लतादीदींनी स्वतःला वाहून घेतले.
लता मंगेशकर यांनी नेहमीच आपल्या भावंडांना स्वतःपेक्षा जास्त प्राधान्य दिले. त्यांच्या सुखासाठी आणि प्रगतीसाठी त्यांनी कोणतीही तडजोड केली नाही. त्यामुळे त्यांना स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, आणि त्या अविवाहित राहिल्या.






