Supriya Sule | राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भावुक प्रतिक्रिया देत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर कुटुंबाची स्थिती आणि राजकीय चर्चांबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. “आज माझा भाऊच नाही राहिला, तर उगाच जुन्या गोष्टी काढण्याचा अर्थ नाही,” असे म्हणत त्यांनी भावना व्यक्त केल्या असून त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
पवार साहेबांच्या प्रकृतीबाबत दिलासा :
सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती दिली. रुबी हॉस्पिटल (Ruby Hall Clinic) येथील डॉक्टर आणि हेल्थ वर्कर्स यांच्या उपचारांमुळे पवार साहेबांची प्रकृती आता खूप सुधारली असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या त्यांचा पाच दिवसांचा अँटीबायोटिक्सचा कोर्स सुरू असून शुक्रवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, वहिनींवर आता मोठी जबाबदारी आली आहे. त्या उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंद आहे, मात्र दादा नसल्याचे दु:ख कायम राहणार आहे. “एका डोळ्यात आनंद आहे, तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत,” असे म्हणत त्यांनी आपल्या मन:स्थितीचे वर्णन केले. अजित पवार कधीच थकलेले किंवा आजारी दिसले नाहीत, इतक्या लहान वयात त्यांचे जाणे अजूनही वास्तव वाटत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
Supriya Sule | विमान अपघात चौकशीवर भूमिका :
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीबाबत सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री (Chief Minister) यांच्या वक्तव्याचा संदर्भ दिला. त्यांनी सांगितले की, या अपघाताची पारदर्शक चौकशी होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. रोहित (Rohit) यांच्या मनात निर्माण झालेली अस्वस्थता आणि प्रश्न स्वाभाविक असल्याचे सांगत, त्यांनी “मुलांना अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, त्यामुळे भावना व्यक्त करणं साहजिक आहे,” असे मत मांडले.
राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. शरद पवार यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आज दादा नसताना जुने मुद्दे काढण्याचा अर्थ नाही. “तो माझा मोठा भाऊ होता. आमच्यात जे काही बोलणं झालं, ते आमच्या दोघांमध्येच होतं,” असे सांगत त्यांनी वैयक्तिक नात्यांना प्राधान्य दिले.
पुढे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) गटांच्या चर्चांबाबत प्रश्न विचारला असता, “माझा भाऊ जाऊन अजून 15 दिवसही झाले नाहीत, त्या धक्क्यातून बाहेर येऊ द्या,” असे भावनिक उत्तर त्यांनी दिले.






