Santosh Deshmukh Murder | संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर चार महिने उलटल्यानंतर आरोपींनी अखेर गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घडामोडीनंतर त्यांच्या भावाने न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नसल्याचं ठामपणे सांगितलं असून, सर्व दोषींना फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली आहे. (Santosh Deshmukh Murder)
आरोपींनी काय दिली कबुली?
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचा अत्यंत क्रूर पद्धतीने खून करण्यात आला होता. या हत्येचे व्हिडीओ शूटिंग आरोपींनी स्वतः केल्याचं समोर आलं होतं. सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या आरोपींनी या गुन्ह्याची कबुली बीड जिल्हा आणि सत्र न्यायालयात दिली आहे. त्यांच्या कबुलीजबाबामुळे या प्रकरणात नवीन वळण आलं असून, वाल्मिक कराड याचं नावही चर्चेत आलं आहे.
या गुन्ह्यातील कृष्णा आंधळे हा अजूनही फरार असून, तो नाशिक शहरात दिसल्याचा दावा अनेकदा करण्यात आला आहे. एकूण आठ आरोपींविरोधात मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, पोलिसांकडे त्यांच्याविरोधात ठोस इलेक्ट्रॉनिक पुरावेही आहेत. मात्र आरोपी वाल्मिक कराड याला मिळणारी विशेष वागणूक (VIP Treatment) राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे.
फाशीशिवाय समाधान नाही – धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, केवळ आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली म्हणून आम्ही समाधानी आहोत, असं म्हणणं ही फार घाईची गोष्ट ठरेल. न्याय मिळवण्यासाठी आपल्याला मोठा संघर्ष करावा लागल्याचं त्यांनी नमूद केलं.
सर्व दोषींना फाशीची शिक्षा व्हावी. तसेच कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली. धनंजय देशमुख यांनी यावर भाष्य करताना सांगितलं की, आम्ही या चार महिन्यांमध्ये प्रचंड संघर्ष केला असून, आरोपींना अटक होण्यासाठी आंदोलनेही केली होती. 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांचा निर्दयपणे खून करण्यात आला होता, त्यानंतर न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केलं.
Title : Santosh Deshmukh Murder Killers Confess After 4 Months






