Samay Raina | यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया (Ranveer Allahbadia) याच्या वादग्रस्त विधानामुळे समय रैना (Samay Raina) याच्या ‘इंडियाज गॉट लेटेन्ट’ (India’s Got Latent) शोवर मोठे संकट आले आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी या शोचे सर्व भाग डिलीट करण्याचे निर्देश दिले असून, देशभरात यावर बंदी घालण्याची मागणीही वाढली आहे. या प्रकरणामुळे मनोरंजन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र पोलिसांचा मोठा निर्णय
‘इंडियाज गॉट लेटेन्ट’ या शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने पालकांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे देशभर संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणावर तातडीने कारवाई करण्याची मागणी अनेक संघटनांनी केली होती. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांना पत्रेही पाठवण्यात आली होती. आता यासंदर्भात सर्वात मोठी अपडेट हाती आली आहे.
तक्रारीनंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी वेळ न घालवता समय रैना आणि शोशी संबंधित इतर व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने या शोचे सर्व भाग त्वरित डिलीट करण्याचे निर्देश दिले असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. यामुळे समय रैना साठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
30 जणांविरोधात गुन्हा दाखल, रणवीरचा माफीनामा-
सूत्रांच्या माहितीनुसार, या शोच्या ताज्या भागातील वादग्रस्त विधानांमुळे पोलिसांनी कठोर पावलं उचलली आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 आणि भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनुसार, एकूण 30 जणांविरोधात कारवाई होणार आहे.
दरम्यान, यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने (Ranveer Allahbadia) जाहीर माफी मागितली आहे. “कोणतेही कारण न देता मला माफ करा,” असं त्याने म्हटलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वादग्रस्त भाग व्हिडीओतून डिलीट करण्याची विनंती ‘इंडियाज गॉट लेटेन्ट’च्या टीमला केली आहे. आता समय रैना यावर काय पाऊल उचलतो?, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.






