Bihar Election Result | बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाला बसलेल्या जबरदस्त धक्क्याचे पडसाद आता यादव कुटुंबात उमटताना दिसत आहेत. लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या या निवडणुकीत आरजेडीला अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी तडकाफडकी निर्णय घेत कुटुंबाशी संबंध तोडण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या विधानामुळे यादव कुटुंबात मोठा भूकंप आल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
रोहिणी आचार्य यांनी एका पोस्टमध्ये लिहिलं की, “मी सर्व दोष स्वतःवर घेत आहे. मी राजकारण सोडत आहे आणि माझ्या कुटुंबाशी संबंध तोडत आहे.” विशेष म्हणजे, नंतर संपादित केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी राज्यसभा खासदार संजय यादव (Sajay yadav) आणि रमीज यांनीच आपल्याला हा निर्णय घेण्यास भाग पाडल्याचा उल्लेख केला. लालू प्रसाद यादव यांच्यावर किडनी विकाराचा उपचार सुरू असताना त्यांनी वडिलांसाठी स्वतःची एक किडनी दान केली होती. त्यामुळे रोहिणी यांच्या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
यादव-बहुल जागांवर राजदला मोठा धक्का :
यावेळी बिहारच्या राजकीय समीकरणात सर्वात मोठा बदल एमवाय म्हणजे मुस्लिम-यादव या बंदोबस्ताच्या तुटण्यातून दिसला. यादवांची १४ टक्के आणि मुस्लिमांची १८ टक्के लोकसंख्या हे आरजेडीचं पारंपारिक ‘कोर वोटबँक’ मानलं जातं. मात्र या निवडणुकीत या दोन्ही गटांनी महाआघाडीकडे पाठ फिरवल्याचं स्पष्ट दिसलं. तेजस्वी यादव यांनी तर 18 नोव्हेंबर रोजी शपथविधी होणार असल्याची उत्सुकता निर्माण केली होती, परंतु प्रत्यक्ष निकालात महाआघाडीला अपेक्षाभंग सहन करावा लागला.
यादव वर्चस्व असलेल्या 55 जागांवर आरजेडीच्या उमेदवारांचा दणदणीत पराभव झाला. 2020 मध्ये या भागातून 55 यादव आमदार निवडून आले होते, परंतु या वेळी संख्या घसरत 28 वर पोहोचली. आरजेडीनं 51 जागांवर यादव उमेदवार उभे केले, तर एनडीएने फक्त 23 यादवांना तिकीट देऊनही त्यापैकी 15 जिंकण्यात यश मिळवले. ही आकडेवारी राजदच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरली.
Bihar Election Result | मुस्लिम बहुल भागातही मोठी पडझड :
यावेळी मुस्लिम प्रतिनिधीत्वाचाही इतिहासातला सर्वात नीचांक नोंदवला गेला. बिहारमध्ये 18 विधानसभा निवडणुकांतील ही सर्वात कमी संख्या ठरली असून केवळ 11 मुस्लिम आमदार निवडून आले. त्यापैकी पाच जण एआयएमआयएमचे आहेत. आरजेडीनं 18 मुस्लिम उमेदवारांवर विश्वास दाखवला पण फक्त तिघांनाच यश मिळालं. काँग्रेसनं दिलेल्या 10 तिकिटांपैकी फक्त 2 उमेदवार विजयी झाले. (Bihar Election Result)
मुस्लिम बहुल भागांमध्ये एआयएमआयएमच्या सक्रिय प्रचारामुळे मुस्लिम मतांचं विभाजन झालं. परिणामी, महाआघाडीचा ‘एमवाय’ फॉर्म्युला कोलमडला, तर एनडीएनं मांडलेल्या महिला-युवा (MY) समीकरणानं चांगला परिणाम दिला. महाआघाडीचे आमदार 2020 मधील 110 वरून थेट 35 वर आले, तर एनडीएचे आमदार 125 वरून तब्बल 202 वर पोहोचले.






