Pune News l पुणे शहरातील वाहतूक कोंडी (Traffic Jam) कमी करण्यासाठी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) येरवडा ते कात्रज असा २० किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग बांधणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ७,५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
भुयारी मार्गाची वैशिष्ट्ये-
या भुयारी मार्गात प्रत्येकी तीन मार्गिका असलेले दोन बोगदे असतील. येरवडा (Yerwada) ते कात्रज (Katraj) या मार्गावर तीन ते चार ठिकाणी भुयारी मार्गातून आत-बाहेर जाण्यासाठी रस्ते असतील. यामुळे शहरातील रस्त्यांवर येणारी लाखो वाहने जमिनीखालून प्रवास करू शकतील, आणि शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल, असा दावा ‘पीएमआरडीए’ने (‘PMRDA’) केला आहे.
दिल्लीहून (Delhi) विमानाने पुण्याला येण्यासाठी दोन तास लागतात, मात्र पुणे विमानतळावरून शहरातील वेगवेगळ्या भागांत जाण्यासाठी आणखी दोन ते अडीच तास लागतात. याचे मुख्य कारण म्हणजे अपुऱ्या दळणवळणाच्या सुविधा, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव आणि ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी. यावर उपाय म्हणून हा भुयारी मार्ग उपयुक्त ठरेल, असे ‘पीएमआरडीए’चे आयुक्त योगेश म्हसे (Yogesh Mhase) यांनी सांगितले.
प्रकल्पाची पुढील दिशा
‘पीएमआरडीए’च्या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून, सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या मार्गावर अत्यंत कमी भूसंपादन करावे लागणार आहे. तीन ते चार ठिकाणी भुयारी मार्गातून मुख्य रस्त्यावर येण्यासाठी अथवा मुख्य रस्त्यावरून भुयारी मार्गात प्रवेश करण्यासाठी आवश्यक जमिनीचे संपादन करावे लागेल.
बाहेरील शहरातून पुणे शहरात येणाऱ्या तसेच कामानिमित्त शहराच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकाला जाणाऱ्या नागरिकांसाठी हा मार्ग उपयुक्त ठरेल. वर्तुळाकार मार्ग, उन्नत मार्गासोबतच आता जमिनीखालून रस्ते मार्ग तयार करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत (Mumbai) झालेल्या ‘पीएमआरडीए’च्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.






