Pahalgam Terror Attack | काश्मीरच्या (Kashmir) पहलगाम (Pahalgam) येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील तीन नागरिक – अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी – यांचा मृत्यू झाला. या भीषण घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेतली असून, त्यात प्रत्यक्षदर्शी हर्षल लेले आणि अनुष्का मोने यांनी हल्ल्याचे भयावह तपशील उघड केले.
हल्ल्याची भयभीत करणारी साक्ष –
संजय लेले यांचे पुत्र हर्षल लेले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “त्यांनी सगळ्यांना खाली बसायला लावलं आणि विचारलं, हिंदू कोण? मुस्लिम कोण? गोळी झाडली तेव्हा माझा हात वडिलांच्या डोक्यावर होता. माझ्या हाताला काहीतरी ओलं वाटलं, पाहिलं तर बाबांचं डोकं रक्ताने भरलेलं होतं.”
त्यांनी सांगितले की, घोडेवाले (Pahalgam Terror Attack) नागरिकांनी मदतीचा हात दिला आणि आईला पाठीवर उचलून घेऊन खाली उतरवलं. चालत घरी पोहचायला चार तास लागले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खाली पोहचले, आणि सात वाजता तिघांच्या मृत्यूची बातमी मिळाली. दुसऱ्या दिवशी पोलिस नियंत्रण कक्षात गेले असता, एका चार वर्षांच्या मुलालाही गोळी लागल्याची माहिती मिळाली.
“आमच्या समोर गोळ्या झाडल्या, सरकारने न्याय द्यावा”-
अतुल मोने (Pahalgam Terror Attack) यांच्या पत्नी अनुष्का मोने यांनी सांगितले की, “दुपारी एक ते दीडच्या सुमारास आम्ही पोहचलो. शूटिंगचा आवाज आला, वाटलं काही गेम असेल. पण थोड्याच वेळात गोळीबार सुरू झाला.” त्या क्षणाची आठवण सांगताना त्यांनी म्हटलं, “दहशतवादी विचारत होते, हिंदू कोण आहे? कुणीच उत्तर दिलं नाही. आमच्या जिजूंनी हात वर केला आणि त्यांना गोळी झाडली.”
अनुष्काच्या म्हणण्यानुसार, अतुल मोने यांनी विनवणी केली – “गोळ्या घालू नका, आम्ही काही करणार नाही.” मात्र तरीही त्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या. “आमच्यासमोर तिघांनाही शूट केलं. ते आमच्या घरातले कर्ते पुरुष होते. सरकारने यावर कठोर कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा,” अशी मागणी अनुष्काने केली.
हर्षल आणि अनुष्का यांनी एकमुखाने सांगितले की, “हल्ला झाला त्या ठिकाणी एकाही सुरक्षा कर्मचाऱ्याची उपस्थिती नव्हती.” घटनास्थळी शेकडो पर्यटक होते, मात्र कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती. हल्ल्यानंतरच्या दहशतीचे वर्णन करताना दोघेही भावुक झाले.






