Bharat Taxi App | नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच देशातील टॅक्सी व्यवसायात मोठा बदल घडण्याची शक्यता आहे. ओला आणि उबरसारख्या खासगी कंपन्यांच्या मक्तेदारीला थेट आव्हान देण्यासाठी ‘भारत टॅक्सी’ (Bharat Taxi) हे स्वदेशी ॲप 1 जानेवारी 2026 पासून अधिकृतपणे सुरू होत आहे. या नव्या सेवेमुळे प्रवाशांना स्वस्त आणि स्थिर दरात प्रवास करता येणार असून, चालकांनाही अधिक उत्पन्न मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
सध्याच्या टॅक्सी सेवांमध्ये (Taxi Service India) पीक अवर्स, पावसाळा किंवा वाहतूक कोंडीच्या नावाखाली अवाजवी दर आकारले जातात. याच पार्श्वभूमीवर प्रवासी आणि चालक या दोघांच्याही हितासाठी ‘भारत टॅक्सी’ ही नवी व्यवस्था सुरू करण्यात येत आहे. या ॲपमुळे टॅक्सी बाजारात स्पर्धा वाढणार असून, प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
सहकारी मॉडेलवर आधारित ‘भारत टॅक्सी’ :
‘भारत टॅक्सी’ हे केवळ एक स्टार्टअप नसून ते ‘सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड’द्वारे चालवले जाणारे सहकारी मॉडेल आहे. खासगी कंपन्यांप्रमाणे जास्त नफा कमावण्याऐवजी सेवा आणि पारदर्शकतेला प्राधान्य देणे, ही या ॲपची प्रमुख संकल्पना आहे. चालकांच्या मालकीची सहकारी संस्था असल्यामुळे निर्णय प्रक्रियेतही चालकांचा सहभाग राहणार आहे.
या ‘ड्रायव्हर-ओन्ड को-ऑपरेटिव्ह सिस्टम’मुळे सध्याच्या व्यवस्थेतील अनेक अडचणी दूर केल्या जाणार आहेत. खासगी ॲप्सकडून आकारले जाणारे मोठे कमिशन, अनिश्चित भाडे आणि चालकांवरील आर्थिक ताण कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
Bharat Taxi App | प्रवासी आणि चालकांना कसा होणार फायदा? :
प्रवाशांसाठी भारत टॅक्सीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पीक अवर्समध्ये आकारल्या जाणाऱ्या दुप्पट-तिप्पट भाड्यापासून सुटका. रास्त दरात सुरक्षित प्रवास देणे हे या सेवचे मुख्य उद्दिष्ट आहे. या ॲपमध्ये कारसोबतच ऑटो आणि बाईक टॅक्सीची सुविधाही उपलब्ध असणार आहे. (Ola Uber Alternative)
चालकांच्या दृष्टीने पाहता, सध्या ओला-उबरमध्ये त्यांना साधारण 70 टक्के भाडे मिळते. मात्र ‘भारत टॅक्सी’मध्ये चालकांना एकूण भाड्याच्या 80 टक्क्यांहून अधिक वाटा मिळणार आहे. यामुळे चालकांच्या उत्पन्नात वाढ होणार असून, त्यांच्या आर्थिक स्थैर्याला हातभार लागणार आहे.
दिल्लीत शुभारंभ, देशभर विस्ताराचा मानस
‘भारत टॅक्सी’ची पहिली अधिकृत सुरुवात 1 जानेवारी 2026 रोजी दिल्लीत होणार आहे. विशेष म्हणजे दिल्लीत आतापर्यंत सुमारे 56 हजार चालकांनी या ॲपवर नोंदणी केली आहे. दिल्लीतील यशानंतर फेब्रुवारीपासून गुजरातच्या राजकोटमध्ये ही सेवा सुरू होण्याची शक्यता असून, पुढील टप्प्यात संपूर्ण देशभरात हे ॲप उपलब्ध करून दिले जाणार आहे. (Bharat Taxi App)
या सेवेमध्ये सुरक्षेलाही विशेष महत्त्व देण्यात आले असून, दिल्ली पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांच्या सहकार्याने विविध सेफ्टी फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. ‘भारत टॅक्सी’च्या आगमनामुळे टॅक्सी बाजारात निकोप स्पर्धा निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






