Mumbai Water Cut | मुंबईतील नागरिकांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. बृहमुंबई महापालिकेने शहरातील काही भागांत 16 तासांचा वॉटर शटडाऊन जाहीर केला आहे. जलवाहिनीचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे काही भागांमध्ये पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर काही भागात कमी दाबाने पाणी मिळणार आहे.
या कामाचा परिणाम प्रामुख्याने वांद्रे पश्चिम, खार पश्चिम आणि सांताक्रूझ पश्चिम परिसरातील नागरिकांवर होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आधीच आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
28 ते 29 मार्चदरम्यान 16 तास शटडाऊन :
पालिकेच्या माहितीनुसार पाली हिल जलाशयाच्या पाणी पातळीत सुधारणा करण्यासाठी वांद्रे पश्चिम परिसरात 750 मिमी व्यासाची नवीन मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. ही जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी काम करण्यात येणार आहे. (BMC Water Shutdown)
हे काम शनिवार, 28 मार्च 2026 रोजी रात्री 11 वाजता सुरू होऊन रविवार, 29 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या 16 तासांच्या कालावधीत काही भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे, तर काही भागात कमी दाबाने पाणी मिळणार आहे.
Mumbai Water Cut | या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद :
रविवार, 29 मार्च रोजी संपूर्ण खार वेस्ट, संपूर्ण Santacruz West आणि बांद्रा वेस्ट मधील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामध्ये बाजार मार्ग, जैन मंदिर मार्ग, डिमोंटे रोड परिसराचा समावेश आहे.
तसेच वांद्रे पश्चिमेकडील हिल रोड, पेरी रोड, सेंट अँड्र्यूज रोड, कार्टर रोड, पालीमाला मार्ग, रणवार गाव, चिंबई गाव, शेर्ली गाव आणि पालीगाव परिसरातही नियोजित वेळेत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (Mumbai Water Cut)
दरम्यान खारदांडा कोळीवाडा, दांडपाडा आणि काही झोपडपट्टी भागांमध्ये रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे तसेच पुढील 4 ते 5 दिवस खबरदारी म्हणून पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.






