Maharashtra Weather Update | महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या तडाख्यामुळे जनजीवन हैराण झाले असून, हवामान खात्याने पुढील 24 तासांसाठी राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेचा इशारा दिला आहे. मुंबईसह इतर शहरे तापलेली असून, आर्द्रतेमुळे उष्मा अधिक तीव्रतेने जाणवत आहे.
राज्यभरात तापमानाचा पारा चाळीशीच्या पुढे
महाराष्ट्रात विदर्भ, उत्तर भाग आणि मराठवाडा येथे तापमानाने चाळीशीचा आकडा गाठला असून काही ठिकाणी तो पारही गेला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये उन्हामुळे त्रास वाढत आहे. गिरीप्रदेशातसुद्धा तीव्र ऊन जाणवत असल्यामुळे थंड हवामानासाठी प्रसिद्ध असलेली ठिकाणेदेखील यंदा उष्णतेने होरपळत आहेत.
एप्रिल संपत आला असताना उष्णतेचा तडाखा अधिक जाणवतो आहे. हवामान खात्याने आता मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट जारी केला असून किनारपट्टीच्या भागांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामानातील बदलांमुळे दमटतेचा त्रास वाढणार
सध्या हिमालय भागात पश्चिमेकडील झंझावात सक्रिय झाले असून, राजस्थानच्या वायव्य भागातून समुद्रसपाटीपासून सुमारे 1.5 किलोमीटर उंचीवर वाऱ्यांची चक्राकार स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र ते कर्नाटक, केरळ, तामिळनाडू पर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे, जे भविष्यात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करू शकते.
तरीदेखील राज्यात सध्या पावसाचा कोणताही धोका नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र भागात दमट वाऱ्यांमुळे त्रास अधिक वाढण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील शहरांमध्येही हवामान दमट राहणार असून, या भागातील नागरिकांना उष्णतेचा अधिक त्रास जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत तापमान 34 ते 37 अंशांदरम्यान असले तरीही आर्द्रतेमुळे शहराचे वातावरण जणू एका भट्टीसारखे झाले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनही हवामान विभागाने केले आहे.
Title : Maharashtra Weather Update Heatwave Alert Issued






