शेतकऱ्यांनो सावधान! उन्हाच्या चटक्यासोबतच आता ‘या’ जिल्ह्यांना गारपिटीचा इशारा

On: April 1, 2026 12:18 PM
Maharashtra Weather Alert
---Advertisement---

Maharashtra Weather Update | राज्यात सध्या हवामानाचे दोन टोकाचे चित्र पाहायला मिळत आहे. एका बाजूला एप्रिलच्या सुरुवातीलाच उन्हाचा कडाका वाढला असून अनेक भागात तापमान 40 अंशांच्या पुढे गेले आहे. तर दुसरीकडे दुपारनंतर ढगांची गर्दी, वादळी वारे आणि पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आजपासून राज्यात अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना गारपिटीचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात उष्णतेचा कहर :

राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत आहे. विशेषतः विदर्भात उष्णतेची लाट जाणवत असून अनेक ठिकाणी तापमान 40 अंशांच्या पुढे गेले आहे. वर्धा जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक 41.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यानंतर अमरावतीमध्ये 41.4 अंश आणि अकोल्यात 41.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

याशिवाय ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वाशीम, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्येही तापमान 40 अंशांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र राज्यातील सातारा येथे 16.5 अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदवले गेले आहे.

Maharashtra Weather Update | या जिल्ह्यांना गारपिटीसह पावसाचा ऑरेंज अलर्ट :

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर, तर विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

तसेच कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. काही ठिकाणी तुरळक गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. (Maharashtra Weather Update)

हवामान विभागाने नागरिकांना वादळी वाऱ्याच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचा सल्ला दिला आहे. विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली उभे राहणे टाळावे तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर शक्यतो टाळावा असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी काढणीस तयार असलेल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असा सल्लाही देण्यात आला आहे.

News Title: Maharashtra Weather Today 1 April 2026: Orange Alert for Hailstorm and Thunderstorm Across Several Districts

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now