Railway | कसारा घाट (Kasara Ghat) ते मनमाड (Manmad) या दरम्यान एक नवीन रेल्वे ट्रॅक उभारण्याच्या हालचाली मध्य रेल्वेने (Central Railway) सुरू केल्या आहेत. तब्बल 140 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी सुमारे चार हजार कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. या नव्या रेल्वेमार्गामुळे प्रवासाच्या वेळेत आणि इंधनाच्या वापरात लक्षणीय बचत होण्याची शक्यता आहे. सध्या रेल्वे मंत्रालयाकडून अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे.
या रेल्वे प्रकल्पासाठी नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांनी मनमाड ते इगतपुरी दरम्यानचा प्रस्ताव थेट कसारापर्यंत नेण्याची मागणी केली होती, जेणेकरून घाटमाथ्यावर लागणाऱ्या वेळेत बचत करता येईल. त्यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी देखील या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला होता.
सध्या इगतपुरी ते कसारा दरम्यान रेल्वे गाड्यांना बँकर इंजिन लावावे लागते, तरीही घाटात गती मंदावते. नवा ट्रॅक टाकल्यामुळे बोगद्यांचे डायमीटर वाढवले जातील आणि प्रवास अधिक वेगाने पार पडेल.
चार नवीन स्थानकांसह प्रवास अधिक गतिमान
या नव्या मार्गावर चार नवीन स्थानके प्रस्तावित आहेत – न्यू नाशिकरोड, न्यू पाडळी, वैतरणानगर आणि चिंचलखैरे. यामुळे या मार्गावरील दळणवळण अधिक सोयीचे होणार आहे. या स्थानकांचा समावेश असल्याने स्थानिक प्रवाशांनाही अधिक सुविधा मिळणार आहेत. मुंबई – नाशिक दरम्यान लोकल सेवा सुरू होण्याचाही मार्ग या नव्या मार्गामुळे मोकळा होऊ शकतो, असे मत हेमंत गोडसे यांनी व्यक्त केले.
या 140 किलोमीटरच्या प्रस्तावित मार्गावर एकूण 12 बोगद्यांचा समावेश करण्यात येणार आहे. यात कसारा घाटासह इतर महत्त्वाचे भूभाग आहेत. या संपूर्ण प्रकल्पासाठी मध्य रेल्वेने 4,000 कोटी रुपयांचा प्राथमिक आर्थिक आराखडा तयार केला आहे. आता या योजनेला रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Title: Kasara-Manmad Railway Route Expansion Plan






