Kangana Ranaut | खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) यांनी ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांच्या एका वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. विद्यार्थी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडमधील आघाडीच्या कलाकारांच्या मौनावर शाह यांनी भाष्य केले होते. त्यानंतर कंगनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून शाह यांच्या भूमिकेवर, देशभक्तीवर आणि त्यांच्या हेतूंवर थेट सवाल उपस्थित केला आहे.
नसीरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यावर कंगनाचा हल्लाबोल :
कंगनाने नुकतीच आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर नसीरुद्दीन शाह यांना उद्देशून काही प्रश्न उपस्थित केले. झारखंडमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांवर ते शांत का आहेत आणि त्या मुद्द्यावर त्यांनी अद्याप भूमिका का मांडलेली नाही, असा सवाल तिने केला. याशिवाय पियुष मिश्रा (Piyush Mishra) यांचा एक व्हिडिओही तिने सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओमध्ये मिश्रा यांनी शाह यांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. याच संदर्भात कंगनाने शाह यांच्यावर निशाणा साधताना त्यांना ‘कोल्हा’ अशी उपमा दिली.
कंगनाने आपल्या पोस्टमध्ये देश आणि निष्ठेबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. तिच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक व्यक्तीची कुणा ना कुणाशी तरी निष्ठा असते; मात्र आपण ज्या देशात राहतो, त्या देशाचे संरक्षण करण्यासाठी आणि त्याच्यासाठी संघर्ष करण्याचा तिला अभिमान आहे. तिने नसीरुद्दीन शाह यांच्यावर आरोप करताना, ते भारतात राहून या देशाचे लाभ घेतात, पण शेजारील देशासाठी लढतात, असा दावा केला. तसेच ‘कुत्रा’ म्हटले जाणे तिला अपमानास्पद वाटत नसून, आजच्या काळात निष्ठा आणि निरागसता दुर्मिळ झाल्यामुळे ही उपमा कौतुकासारखीच असल्याचे तिने म्हटले.
Kangana Ranaut | विद्यार्थी आंदोलनांवरील मौनावरून वाद चिघळला :
नवी दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीकडून झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड कलाकारांच्या शांततेवर नसीरुद्दीन शाह यांनी काही दिवसांपूर्वी प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रभावशाली व्यक्तींच्या मौनावर टीका केली. या कलाकारांची अवस्था तोंडात हाड धरलेल्या कुत्र्यासारखी असल्याचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, परिस्थिती अनुकूल होईपर्यंत किंवा त्यांच्या सद्सद्विवेकबुद्धीला बोलण्याची परवानगी मिळेपर्यंत ते आपली प्रतिक्रिया देणार नाहीत.
शाह यांनी आपल्या उदाहरणातून सांगितले की, तोंडात हाड असलेला कुत्रा भुंकू शकत नाही. ते हाड खाली पडले किंवा त्याचे दात तुटले की तो पुन्हा भुंकू शकतो, अशी उपमा त्यांनी दिली. मुलाखतीत त्यांना कलाकार आणि इतर लोक परिस्थितीचा फायदा घेणाऱ्यांना मोकळे रान देत आहेत का, तसेच जाणूनबुजून आपली सद्सद्विवेकबुद्धी दाबून ठेवत आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हेच घडत असल्याचे स्पष्टपणे मान्य केले. मात्र हे किती काळ सुरू राहणार, याचे उत्तर सध्या कुणाकडे नसून त्याचा निर्णय काळच घेईल, असेही त्यांनी नमूद केले. या वक्तव्यानंतर कंगना आणि नसीरुद्दीन शाह यांच्यातील शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.





