India Iran Relations | मध्यपूर्वेत सुरू असलेल्या भीषण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने घेतलेल्या एका निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला उधाण आले आहे. अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या दरम्यान भारताने इराणच्या एका युद्धनौकेला आपल्या बंदरात आश्रय देण्यास परवानगी दिली. या निर्णयाबद्दल इराणने भारताचे आभार मानत त्याचे खुलेपणाने कौतुक केले आहे.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताचा निर्णय :
सध्या मध्यपूर्वेत इराण (Iran), अमेरिका (United States) आणि इस्रायल (Israel) यांच्यातील संघर्ष तीव्र झाला असून युद्धाला दहा दिवस पूर्ण झाले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणने कोणतीही अट न ठेवता शरणागती पत्करावी, अशी मागणी केली होती. मात्र इराणने हा प्रस्ताव नाकारल्यानंतर अमेरिकेकडून हल्ल्यांची तीव्रता वाढवण्यात आली. याचदरम्यान इस्रायलनेही इराणवर हल्ले सुरू ठेवले असून अमेरिकेकडून इराणच्या तेलसाठ्यांवर लक्ष्य साधले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
या हल्ल्यांमध्ये इराणचे मोठे नुकसान झाले असले तरी त्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. इराणच्या हल्ल्यांमुळे अमेरिकेलाही नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व घटनांदरम्यान भारताशी संबंधित एक महत्त्वाची बाब उघड झाली. भारतातून परतणाऱ्या इराणच्या एका युद्धनौकेवर अमेरिकेच्या पाणबुडीने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्या हल्ल्यात ही नौका बुडाली आणि त्यामधील 87 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जाते.
India Iran Relations | कोची बंदरात युद्धनौकेला परवानगी :
या घटनेनंतर इराणकडून त्यांची दुसरी युद्धनौका आयआरआयएस लवन (IRIS Lavan) भारतातील कोची (Kochi) बंदरात थांबवण्यासाठी परवानगी मागण्यात आली. भारताने ही विनंती मान्य करत त्या नौकेला कोची बंदरात डॉक करण्यास संमती दिली. भारताच्या या निर्णयानंतर इराणने भारताचे औपचारिक आभार मानले असून हे पाऊल मानवतावादी दृष्टिकोनातून घेतल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी राज्यसभेत यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की इराणमधील परिस्थिती सध्या गंभीर असल्यामुळे उच्चस्तरीय संपर्क ठेवणे कठीण झाले आहे. तरीही उपलब्ध राजनैतिक माध्यमांद्वारे संवाद कायम ठेवण्यात येत आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी 20 फेब्रुवारीला तसेच संघर्ष सुरू झाल्यानंतर 5 मार्च रोजी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची (Abbas Araghchi) यांच्यासोबत चर्चा झाली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या जहाजाला कोची बंदरात थांबण्याची परवानगी देण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारताने घेतलेली ही भूमिका अमेरिकेसाठी धक्का मानली जात असून या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी चर्चा सुरू झाली आहे.






