Indian Navy | इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगाची ‘ऊर्जा जीवनरेखा’ मानली जाणारी होर्मुझची सामुद्रधुनी सध्या अत्यंत तणावाचे केंद्र बनली आहे. या मार्गावरून होणारा जागतिक व्यापार इराणने रोखला असला तरी, भारतासाठी एक अत्यंत दिलासादायक चित्र समोर आले आहे. भारतीय झेंडा असलेल्या जहाजांना या संघर्षातून सुरक्षित मार्ग मिळत असून, भारतीय नौदल (Indian Navy) यामध्ये देवदूताची भूमिका बजावत आहे.
भारतीय नौदलाची ढाल आणि रणनीती
भारतीय नौदल तेल आणि एलपीजी वाहून नेणाऱ्या टँकर्सना केवळ संरक्षणच देत नाही, तर पर्शियन आखातातून बाहेर पडेपर्यंत त्यांना टप्प्याटप्प्याने मार्गदर्शनही करत आहे. होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडल्यानंतर, नौदलाच्या विनाशिका (Destroyers) आणि फ्रिगेट्स या भारतीय जहाजांना पूर्णपणे सुरक्षित टप्प्यापर्यंत एस्कॉर्ट (Escort) करतात.
युद्धाचे गांभीर्य ओळखून नौदलाने ओमानच्या आखातात आपली गस्त आणि युद्धनौकांची तैनाती लक्षणीयरीत्या वाढवली आहे.वरवर शांत दिसणाऱ्या समुद्राखाली अनेक धोके दडलेले असतात. त्यातच इराणने होर्मुझच्या आसपास पाण्याखालील सुरुंग (Underwater mines) पेरले असल्याचा मोठा धोका वर्तवला जात आहे. अशा वेळी भारतीय जहाजांना सुरक्षित ठेवण्यासाठी जलशास्त्रीय नकाशे (Hydrographic charts) अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
हे नकाशे समुद्राची नेमकी खोली, तळाची रचना आणि संभाव्य धोक्यांची अचूक माहिती देतात, ज्यामुळे जहाजे सुरक्षित मार्गाने मार्गक्रमण करू शकतात.अरबी समुद्र आणि हिंद महासागरात कार्यरत असलेली बहुतांश जहाजे भारताने तयार केलेल्या जलसर्वेक्षण नकाशांचाच वापर करतात. भारत अनेक मित्र देशांसाठीही असे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त नकाशे तयार करतो. भारतीय नौदलाची चोख दक्षता आणि अचूक रणनीती यामुळेच, मध्यपूर्वेतील या महाभयंकर युद्धातही भारताची ऊर्जा पुरवठा साखळी पूर्णपणे सुरक्षित राहिली आहे. भारतीय नौदलाच्या या खंबीर पावलांमुळे देशाची ऊर्जा पुरवठा साखळी आणि इंधन सुरक्षित राहिले आहे.






