India Oil Stocks | इराण युद्ध आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाढता धोका पाहता, संपूर्ण जगाचे लक्ष इंधन पुरवठ्याकडे लागले आहे. जागतिक पुरवठा साखळी अचानक विस्कळीत झाल्यास भारत किती दिवस टिकू शकेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी भारताने अत्यंत खास आणि सुरक्षित व्यवस्था केली आहे. भारताने कच्च्या तेलाचे मोठे साठे जमिनीखालील पर्वतीय गुहांमध्ये सुरक्षित ठेवले आहेत. हे साठे देशाच्या धोरणात्मक पेट्रोलियम साठा (Strategic Petroleum Reserve – SPR) योजनेचा भाग आहेत.
या योजनेची कल्पना 1991 च्या आखाती युद्धानंतर पुढे आली. त्या वेळी भारताला गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. तेल आयातीसाठी लागणारा परकीय चलन साठा कमी होत होता आणि देशात तेलाचा साठा अत्यंत मर्यादित असल्याची चिंता व्यक्त केली जात होती. त्यानंतर भारताने भविष्यातील आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन धोरणात्मक तेल साठे उभारण्याचा निर्णय घेतला.
कुठे आहे हा गुप्त साठा?
भारताने हे ‘स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह’ (SPR) दक्षिण भारतातील कठीण आणि अभेद्य अशा ग्रॅनाइट आणि बेसाल्ट खडकांमध्ये बांधले आहेत. हे साठे जमिनीखाली गुहांच्या आकारात आहेत, जिथे भूकंप किंवा क्षेपणास्त्र हल्ल्याचाही सहजासहजी परिणाम होत नाही. सध्या देशात तीन प्रमुख ठिकाणी हे साठे आहेत:
विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश), मंगळुरू (कर्नाटक), पादूर (कर्नाटक) या तीनही ठिकाणांची मिळून एकूण साठवणूक क्षमता 5.33 दशलक्ष मेट्रिक टन इतकी आहे. आपत्कालीन परिस्थितीत हा साठा सुमारे 9 ते 10 दिवसांची तेलाची गरज भागवू शकतो. हे साठे पर्वतांच्या घन खडकांमध्ये गुहांसारख्या रचनांमध्ये तयार केले आहेत, जेणेकरून युद्ध, नैसर्गिक आपत्ती किंवा पुरवठा खंडित झाल्यास ते सुरक्षित राहतील.
भारताची पुढील रणनीती
आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या (IEA) नियमानुसार, प्रत्येक देशाकडे किमान 90 दिवसांचा राखीव साठा असावा. सध्या अमेरिका (40 दिवस), दक्षिण कोरिया (90 दिवस) आणि चीनकडे (130 दिवस) भारतापेक्षा जास्त राखीव साठा आहे. कोणत्याही जागतिक संकटात देशाची चाके थांबू नयेत, यासाठी भारताचा ‘प्लॅन बी’ पूर्णपणे तयार आहे.






