Crime News | झारखंड (Jharkhand) राज्यातील खुंटी (Khunti) जिल्ह्यात एका धक्कादायक घटनेत पाच अल्पवयीन मुलींचं अपहरण करून त्यापैकी तीन मुलींवर १८ अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केला. या घृणास्पद घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे.
अपहरण आणि अत्याचाराची घटना
शुक्रवारी रात्री उशिरा रनिया (Rania) परिसरात एका विवाह सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर पाच अल्पवयीन मुली घरी परतत होत्या. त्यावेळी काही मुलांनी त्यांचा पाठलाग केला. निर्मनुष्य ठिकाणी त्यांनी मुलींना पकडून जवळच्या डोंगरावर नेलं. या दरम्यान, दोन मुली आरोपींच्या तावडीतून पळून गावात पोहोचल्या आणि त्यांनी घडलेला प्रकार गावकऱ्यांना सांगितला. या घटनेनंतर गावकऱ्यांनी आणि पीडित मुलींनी पोलिसांकडे धाव घेतली.
आरोपी अटकेत
खुंटी (Khunti) जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक अमन कुमार (Aman Kumar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ आरोपींनी तीन मुलींवर सामूहिक बलात्कार केला. सुदैवाने, दोन मुली आरोपींच्या तावडीतून निसटल्या.
पीडित मुलींनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, सर्व आरोपींना अटक करून बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे.
पीडित मुलींचे वय १२ ते १६ वर्षांच्या दरम्यान आहे, तर आरोपींचे वय १२ ते १७ वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या सामूहिक अत्याचाराच्या घटनेने समाजात प्रचंड खळबळ माजली असून, महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.






