Pune News | पुणे शहरात ‘गुइलेन बरे सिंड्रोम’चा (Guillain-Barre Syndrome) (जीबीएस) प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा (Water Supply) करण्याची खबरदारी घेण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक (Sujata Saunik) यांनी दिले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिका आयुक्त, तसेच विभागीय आयुक्तांना त्यांनी याबाबत पत्र पाठवले आहे. यासंदर्भात पाठवण्यात आलेल्या पत्रामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कारण कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महापालिकांना कठोर शब्दात सूचना :
मुख्य सचिवांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, पुणे महापालिका आणि ग्रामीण भागात शुद्ध पाण्याचा पुरवठा समाधानकारक होत नाही. त्यामुळे, संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामात कुचराई केल्यास शिस्तभंगाची कारवाई करावी. नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याची ताकीदही त्यांनी दिली आहे.
पाण्याच्या शुद्धीकरणाबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाकडून संबंधित महापालिका आयुक्तांशी संपर्क साधण्यात आला आहे, परंतु स्थिती समाधानकारक नाही. ‘जीबीएस’चा प्रादुर्भाव असलेल्या परिसरात शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ आदेश द्यावेत, अशा सूचना मुख्य सचिवांनी दिल्या आहेत.
दरम्यान, दूषित पाण्यामुळे पुणेकरांच्या जीवाशी मोठा खेळ झाला आहे. पोटदुखी, जुलाब, उलट्या या सारख्या आजारानंतर पुण्यातील काही भागांमध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) या आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रभाव झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये सुद्धा या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत.
‘जीबीएस’ बाधित आणखी रुग्णाचा मृत्यू :
नुकतंच जीबीएसचं निदान झालेल्या ५९ वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा रुग्ण खडकवासला (Khadakwasla) येथील असून, जीबीएसची लक्षणे आढळल्याने १० फेब्रुवारी रोजी काशीबाई नवले रुग्णालयात (Kashibai Navale Hospital) दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर झाल्याने मंगळवारी (११ फेब्रुवारी) रोजी रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत पुण्यात ‘जीबीएस’मुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
News Title : Chief Secretary’s Warning on Pure Water Supply






