Bhendwal | बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे ३७० वर्षांची परंपरा असलेली प्रसिद्ध घटमांडणी (Ghat Mandani) आज, अक्षय्य तृतीयेच्या (Akshay Tritiya) मुहूर्तावर सायंकाळी होणार आहे. या मांडणीतून मिळणाऱ्या पीक-पाणी, राजकीय आणि सामाजिक संकेतांकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेषतः सध्याच्या तणावपूर्ण वातावरणात युद्धाबाबत काय संकेत मिळतात, याची उत्सुकता आहे.
३७० वर्षांची अनोखी परंपरा
पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या भेंडवळ (Bhendwal) गावात दरवर्षी अक्षय्य तृतीयेला (Akshay Tritiya) सायंकाळी ५:३० वाजता घटमांडणी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयावेळी त्याआधारे वर्षभराचे अंदाज जाहीर केले जातात. ही केवळ पीक-पाण्याची भविष्यवाणी नसून, देशाची आर्थिक-राजकीय स्थिती, नैसर्गिक आपत्ती आणि परकीय संकटांचेही संकेत यात मिळतात, असा शेतकऱ्यांचा दृढ विश्वास आहे.
ही ३७० वर्षे जुनी परंपरा असून, शेतकऱ्यांसाठी तिचे सांस्कृतिक आणि भावनिक महत्त्व मोठे आहे. या भाकितांवरून अनेक शेतकरी आपल्या वर्षभराच्या शेतीचे नियोजन करतात. त्यामुळे, या मांडणीकडे केवळ बुलढाणा (Buldhana) जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असते.
युद्धाच्या शक्यतेने उत्सुकता वाढली
अलीकडेच जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) भारत-पाकिस्तान (India-Pakistan) संबंध ताणले गेले आहेत. देशात संतापाची लाट असून, पाकिस्तानवर (Pakistan) कठोर कारवाईची मागणी होत आहे. युद्धजन्य परिस्थितीची शक्यताही वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर, भेंडवळच्या घटमांडणीत युद्धाबाबत काय संकेत मिळतात, याकडे सर्वांची उत्सुकता आहे.
दुसरीकडे, या घटमांडणीला कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (Andhshraddha Nirmoolan Samiti) म्हणणे आहे. समितीचे हमीद दाभोळकर (Hamid Dabholkar) यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांतील अंदाज खरे ठरलेले नाहीत आणि त्याच त्या गोष्टी फिरवून सांगितल्या जातात. त्यांनी शेतकऱ्यांना अशा अंदाजांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. मात्र, शास्त्रीय आधार नसला तरी, शेतकऱ्यांचा या परंपरेवरील विश्वास आजही कायम आहे.






