Bangladesh Crisis | बांगलादेशात सध्या परिस्थिती अत्यंत तणावग्रस्त झाली आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना ( Sheikh Hasina) यांच्यावरील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाच्या (ICT) महत्वपूर्ण सुनावणीपूर्वी देशात अस्थिरता वाढल्याचे चित्र दिसत आहे. सत्तापालटानंतर जवळपास दीड वर्षांपासून शेख हसीना भारतात आश्रय घेत राहत असून या काळात बांगलादेशात राजकीय असंतोष आणि आंदोलनांची तीव्रता वाढली आहे. आजच्या सुनावणीमुळे देशात सुरक्षा अधिक कडक करण्यात आली असून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या संसदीय निवडणुकांपूर्वी हा निकाल लागणार असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. 5 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या सत्तापालटानंतर शेख हसीना ( Sheikh Hasina) देशातून बाहेर पडल्या आणि त्यानंतर देशभरात मोठी घडामोडी घडल्या. लोकांनी पंतप्रधान भवनात घुसखोरी केली, मोठे आंदोलन पेटले आणि परिस्थिती पूर्णपणे अनियंत्रित झाली होती. सत्तापालटानंतरचे आरोप, आंदोलन आणि राजकीय तणाव या सर्वांच्या छायेत आजचा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे.
सुनावणीपूर्वी देशव्यापी बंद; ढाक्यात कठोर आदेश
आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणात आज शेख हसीना आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरील मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांवरील निकालाची सुनावणी होणार आहे. निकालापूर्वी वातावरण तापले असून शेख हसीनांच्या अवामी लीग पक्षाने देशव्यापी बंदची हाक दिली आहे. यामुळे सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक संस्था आणि व्यापारिक व्यवहारांवर मोठा प्रभाव दिसत आहे. आंदोलन हिंसक बनण्याची भीती व्यक्त करण्यात आली असून सुरक्षादलांना तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Bangladesh Crisis News)
ढाका मेट्रोपॉलिटन पोलिस आयुक्त शेख मोहम्मद सज्जाद अली यांनी थेट आदेश देत सांगितले की, हिंसाचार करणाऱ्यांना “दिसताक्षणी गोळीबार” करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. या आदेशामुळे राजकीय तणाव आणखी वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
Bangladesh Crisis | भारत-बांगलादेश तणाव वाढण्याची शक्यता; सीमेवर सुरक्षा कडक :
भारताने शेख हसीना यांना आश्रय दिल्यामुळे बांगलादेशातील अंतरिम सरकार आणि काही गट भारतावर दबाव टाकत आहेत. अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी अनेक वेळा भारताला मागणी केली की, शेख हसीना यांना बांगलादेशाच्या स्वाधीन करावे. यामुळे दोन्ही देशांमध्ये राजनैतिक तणाव निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भारताने बांगलादेश सीमेजवळ सुरक्षा अधिक वाढवली आहे. (Bangladesh High Alert)
शेख हसीना ( Sheikh Hasina) यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत युनूस यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले की, “दहशतवादी संघटनांशी सहयोग झाल्यामुळे बांगलादेश अतिरेकी विचारसरणीकडे ढकलला जात आहे.” तसेच मातृभूमी सोडावी लागल्याने झालेली वेदना त्यांनी व्यक्त केली. “बांगलादेशाच्या लोकांवर मला पूर्ण विश्वास आहे. ते लोकशाहीचीच निवड करतील,” असेही त्यांनी स्पष्ट केले. आजच्या सुनावणीकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागलेल्या आहेत.






