ATM Charges Increase l एटीएम वापरणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एटीएम व्यवहारांशी संबंधित शुल्काच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. येत्या १ मे २०२५ पासून हे नविन नियम लागू होणार असून, त्यानुसार एटीएममधून पैसे काढणे आता अधिक महाग होणार आहे.
बँकांच्या मागणीनंतर आणि एटीएम सेवा देण्याचा खर्च वाढल्यामुळे RBI ने इंटरचेंज शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांनी मोफत व्यवहारांच्या मर्यादा लक्षात घेऊन आपला व्यवहार नियोजनपूर्वक करणे गरजेचे आहे, अन्यथा अतिरिक्त शुल्काचा फटका सहन करावा लागू शकतो.
नव्या शुल्कानुसार व्यवहार महाग; हे आहेत बदल :
१ मेपासून आर्थिक व्यवहारासाठीचे इंटरचेंज शुल्क १५ रुपयांवरून १७ रुपये करण्यात आले आहे. तर गैर-आर्थिक व्यवहारासाठी (उदा. बॅलन्स चेक करणे) हे शुल्क ५ रुपयांवरून ६ रुपये होणार आहे.
मोफत व्यवहारांनंतर ग्राहकांकडून आकारले जाणारे शुल्कदेखील वाढवण्यात आले असून, आतापर्यंत जेथे प्रत्येक व्यवहारासाठी २० रुपये घेतले जात होते, तिथे आता २१ रुपये आकारले जाणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम सामान्य ग्राहकांवर होणार आहे, विशेषतः जे नियमितपणे एटीएमचा वापर करतात.
ATM Charges Increase l शहरानुसार मोफत व्यवहार मर्यादा; नियोजन आवश्यक :
RBI च्या नियमांनुसार, मेट्रो शहरांमध्ये ग्राहकांना त्यांच्या बँकेच्या एटीएममधून ५ मोफत व्यवहार आणि इतर बँकांच्या एटीएममधून ३ मोफत व्यवहार मिळतात. तर गैर-मेट्रो शहरांमध्ये ही मर्यादा थोडी जास्त असून, ५+५ मोफत व्यवहार दिले जातात.
त्यामुळे जे ग्राहक एटीएमचा वारंवार वापर करतात, त्यांनी त्यांच्या बँकेच्या नियमांची माहिती करून घेणे आणि अनावश्यक व्यवहार टाळणे हे अधिक फायदेशीर ठरेल. कारण फक्त एक व्यवहार जरी मोफत मर्यादेबाहेर गेला, तरी त्याचा अतिरिक्त खर्च आता जास्त असणार आहे.






