Ladki Bahin Yojana l राज्यातील महिलांसाठी जाहीर करण्यात आलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सध्या मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे. या योजनेतून 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. मात्र, महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेलं “2100 रुपये देऊ” हे आश्वासन अद्याप प्रत्यक्षात आलेलं नाही. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमधील एका कार्यक्रमात या योजनेवर सूचक वक्तव्य केलं आहे, जे सध्या चर्चेचा विषय बनलं आहे.
गेल्या वर्षी जुलैमध्ये महायुती सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात ही योजना जाहीर केली होती. त्यानंतर आजवर नऊ हप्ते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. मात्र सरकार स्थापन होऊन आता चार महिने उलटले तरीही वाढीव रकमेचा निर्णय अद्याप झालेला नाही.
अजित पवारांचं वक्तव्य नेमकं काय? :
“सध्या आपण महिलांना दरमहा 1500 रुपये देत आहोत. पण परिस्थिती सुधारली की त्यावर पुढचा विचार केला जाईल,” असं सूचक विधान अजित पवारांनी केलं. मात्र ‘परिस्थिती सुधारली की’ हे नेमकं कधी, आणि 2100 रुपये कधीपासून देण्यात येणार, यावर त्यांनी मौन बाळगले. त्यामुळे सरकारने दिलेलं आश्वासन केवळ निवडणुकीपुरतं होतं का, असा प्रश्न आता लाभार्थी महिलांपासून ते विरोधकांपर्यंत सर्वांना पडला आहे.
राज्याच्या नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनेतील वाढीव रकमेबाबत कोणतीही ठोस घोषणा झाली नाही. त्यामुळे योजनेच्या भविष्याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. “महिलांचे आश्वासन फसवे ठरतेय,” अशी जोरदार टीका सध्या सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे.
Ladki Bahin Yojana l योजना बंद होणार नाही, पण… :
सरकारमधील मंत्र्यांनी ही योजना बंद होणार नसल्याचं सांगितलं असलं तरी 2100 रुपयांची घोषणा कधी अमलात येईल, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. सरकारकडून फक्त “लवकरच निर्णय होईल” अशी आश्वासनं मिळत आहेत. मात्र तो “लवकरच” केव्हा येणार याचं उत्तर अद्याप गुलदस्त्यातच आहे.






