Aadhar Card Update | देशातील लोकांच्या दैनंदिन आयुष्यात आधार कार्ड हा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज बनला आहे. सिमकार्ड घेण्यापासून ते सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक असतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाचे आधार अद्ययावत राहणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र अनेक वर्षांपासून एक मोठी समस्या कायम होती, मृत व्यक्तींचे आधार क्रमांक प्रणालीमध्ये सक्रिय राहणे. यामुळे गैरव्यवहार आणि फसवणुकीच्या अनेक घटना घडत होत्या. (Aadhar Card Update)
याच पार्श्वभूमीवर UIDAI ने एक मोठी मोहीम हाती घेतली असून, देशभरातील 2 कोटींपेक्षा अधिक मृत व्यक्तींचे आधार क्रमांक अधिकृतरीत्या निष्क्रीय करण्यात आले आहेत. आधार प्रणाली सुरू झाल्यापासून गेल्या 15 वर्षांत करोडो लोकांची नोंदणी झाली. पण अनेकांच्या मृत्यूची माहिती UIDAI पर्यंत पोहोचली नाही, त्यामुळे त्यांचे आधार क्रमांक अनेक वर्षे सक्रिय राहिले होते.
फसवणुकीला आळा घालण्यासाठी UIDAI चे मोठे पाऊल :
मृत व्यक्तींचे आधार क्रमांक सक्रिय असल्याचा गैरफायदा घेत अनेक ठिकाणी फसवणुकीचे प्रकार झाल्याचे समोर आले. काही ठिकाणी या क्रमांकांचा वापर करून बँक खाते उघडणे, सरकारी योजनांचा लाभ घेणे, लाभार्थी यादीत नाव जोडणे अशा गंभीर अनियमितता आढळल्या. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी UIDAI ने देशव्यापी मोहीम सुरू केली.
UIDAI च्या डेटाबेसमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने कधीच न रद्द होणारे आधार क्रमांक ही मोठी प्रशासकीय समस्या बनली होती. आता प्रथमच मोठ्या प्रमाणावर मृत व्यक्तींची नोंद पडताळून त्यांच्या क्रमांकांना निष्क्रिय करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात गैरवापराची शक्यता लक्षणीय कमी होणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
Aadhar Card Update | मृत्यूची नोंदणी करण्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध :
UIDAI ने मृत व्यक्तींचा डेटा मिळवण्यासाठी अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय संस्थांसोबत समन्वय साधला आहे. यामध्ये भारताचे रजिस्ट्रार जनरल, राज्यांची नागरी नोंदणी प्रणाली, सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) आणि राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम (NSAP) यांचा समावेश आहे. या संस्थांकडील रेकॉर्ड तपासून UIDAI स्वतंत्र यंत्रणेद्वारे मृत्यूची पुष्टी करून मगच आधार निष्क्रिय करते.
यासोबतच UIDAI पोर्टलवर एक नवीन सुविधा उपलब्ध झाली आहे :
“कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूची नोंदणी” (Death Reporting Facility).
या माध्यमातून कुटुंबीय स्वतः खालील माहिती भरू शकतात:
– मृत व्यक्तीचा आधार क्रमांक
– मृत्यू नोंदणी क्रमांक
– मृत्यू प्रमाणपत्रातील माहिती
ही माहिती सबमिट झाल्यानंतर UIDAI पडताळणी करून संबंधित आधार क्रमांक निष्क्रिय करते. त्यामुळे चुकून जिवंत व्यक्तीचा आधार बंद होण्याचा धोका राहणार नाही. (Aadhaar Deactivated)
UIDAI चा स्पष्ट सल्ला आहे की अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र मिळताच तात्काळ UIDAI पोर्टलवर मृत्यूची नोंदणी करावी, जेणेकरून गैरवापराची शक्यता पूर्णपणे संपुष्टात येईल. तसेच निष्क्रिय केलेला आधार क्रमांक कधीही इतर कोणालाही पुनः जारी केला जाणार नाही, अशीही माहिती देण्यात आली आहे.






