Ajit Pawar Statement | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी आणि धक्कादायक घडामोड घडताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचार सभेदरम्यान केलेल्या एका वक्तव्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का, याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांनी थेट शरद पवार यांचे नाव घेत त्यांच्याविषयी आदरयुक्त विधान केल्याने राजकीय संकेतांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Ajit Pawar Statement)
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये (pimpri chinchwad) आयोजित सभेत अजित पवार यांनी दिलेले भाषण केवळ स्थानिक राजकारणापुरते मर्यादित न राहता राज्यपातळीवर चर्चेचा विषय ठरले आहे. अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या राजकीय भूमिकांमध्ये असलेल्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये पुन्हा जवळीक वाढते आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
‘काकांच्या पुण्याईनेच माझं सगळं बरं चाललंय’ :
सभेदरम्यान अजित पवार यांनी थेट गळ्याची शपथ घेत एक महत्त्वाचे विधान केले. “माझं सगळं काकांच्या पुण्याईनेच लय बरं चाललंय,” असे म्हणत त्यांनी आपल्या यशाचे श्रेय थेट शरद पवार यांना दिले. एवढेच नाही, तर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाचा उल्लेख करत त्यांनी त्यांना ‘पुढची दृष्टी असलेले नेतृत्व’ असे संबोधले.
या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याआधी दोन्ही गटांमधील मतभेद खुलेपणाने दिसत होते. मात्र अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे संभाव्य विलीनीकरणाचे संकेत मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी कोणताही संकोच न बाळगता शरद पवारांच्या योगदानाची जाहीर कबुली दिल्याने अनेक राजकीय समीकरणे पुन्हा तपासली जात आहेत.
Ajit Pawar Statement | तुतारी आणि घड्याळ एकत्रचे संकेत :
अजित पवार (ajit pawar) यांनी आपल्या भाषणात म्हटले की, “यावेळी आम्ही तुतारी आणि घड्याळ बरोबर घेतलं आहे. आता कोणाशीही वाद घालायचा नाही. मागे जे काही घडलं, ते गंगेला मिळालं. आता एकोप्याने काम करायचं आहे.” या विधानामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी निवडणुकीत एकत्र लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या शब्दांनी केवळ कार्यकर्त्यांनाच नव्हे, तर विरोधकांनाही विचारात पाडले आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचे संकेत देणे, हे रणनीतीचा भाग असल्याचे मानले जात आहे.
भ्रष्टाचारावर थेट हल्लाबोल :
भाषणात अजित पवार यांनी महापालिकेतील कथित भ्रष्टाचारावरही जोरदार टीका केली. सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर पैसे आणि सत्तेची मस्ती असल्याचा आरोप करत त्यांनी ‘भ्रष्टाचाराचा आका’ संपवण्याचा निर्धार व्यक्त केला. शहराच्या कारभारात दादागिरी आणि गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप करत, जनतेने आता बदल घडवून आणावा, असे आवाहनही त्यांनी केले. (Pimpri Chinchwad election update)
विशेष म्हणजे, नाव न घेता एका आमदाराच्या वाढत्या मालमत्तेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. २०१७ पासून शहराचा कारभार ज्यांच्या हातात होता, त्यांच्या संपत्तीचा स्रोत काय, असा थेट सवाल केल्याने पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात वातावरण चांगलेच तापले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






