Sugar Price Hike | महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये साखरेच्या किमतीने अचानक मोठी उसळी घेतली आहे. काही जिल्ह्यांमध्ये किरकोळ बाजारातील दर थेट 80 रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने ग्राहकांच्या घरगुती खर्चावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. घाऊक बाजारातही साखरेचा भाव 7,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात मिठाई महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अनेक जिल्ह्यांत साखर 70 रुपयांच्या पुढे :
साखरेच्या वाढलेल्या दरामुळे रोजच्या वापरातील चहा, नाश्ता आणि इतर घरगुती पदार्थांसाठी होणाऱ्या खर्चात वाढ होऊ शकते. ग्राहकांना नियमितपणे खरेदी कराव्या लागणाऱ्या साखरेचा भाव वाढल्याने त्याचा थेट परिणाम महिन्याच्या किराणा बजेटवर जाणवण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, आगामी काळात दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे.
जिल्हानिहाय बाजारभाव पाहिल्यास मुंबई (Mumbai) येथे साखरेचा किरकोळ दर 60 ते 65 रुपये किलो आहे. सांगली (Sangli) येथे तो 80 रुपये, तर बुलढाणा (Buldhana) आणि वाशिम (Washim) येथे 78 ते 80 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. कोल्हापूर (Kolhapur) आणि नाशिक (Nashik) येथे 75 रुपये, पुणे (Pune) येथे 72 रुपये, तर परभणी (Parbhani) आणि सातारा (Satara) येथे 70 रुपये किलो दर नोंदवला गेला आहे. पालघर (Palghar) मध्ये 65 ते 70 रुपये, भंडारा (Bhandara) येथे 68 ते 70 रुपये आणि जळगाव (Jalgaon) येथे 68 रुपये किलो भाव आहे.
Sugar Price Hike | मिठाई महागण्याची शक्यता :
अकोला (Akola) आणि नांदेड (Nanded) येथे साखरेचा किरकोळ भाव 65 रुपये किलो आहे. रत्नागिरी (Ratnagiri) येथे 62 रुपये, वर्धा (Wardha) येथे 62 ते 64 रुपये, तर चंद्रपूर (Chandrapur) आणि गडचिरोली (Gadchiroli) येथे 60 रुपये किलो दर आहे. नागपूर (Nagpur) येथे साखर 68 ते 70 रुपये किलो मिळत आहे. अमरावती (Amravati) येथे 75 रुपये, यवतमाळ (Yavatmal) येथे 75 ते 78 रुपये, गोंदिया (Gondia) आणि लातूर (Latur) येथे 70 रुपये, तर हिंगोली (Hingoli) येथे 70 ते 75 रुपये किलो दर असल्याचे सांगण्यात आले आहे. या आकडेवारीवरून राज्यातील अनेक ठिकाणी साखरेचा किरकोळ भाव 70 रुपयांच्या वर गेला आहे.
साखरेच्या दरवाढीचा परिणाम केवळ किराणा बाजारापुरता मर्यादित राहण्याची शक्यता नाही. मिठाई तयार करताना साखरेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने तिच्या किमतीत झालेली वाढ थेट उत्पादन खर्चावर परिणाम करते. हिंगोलीसह इतर शहरांतील मिठाई विक्रेत्यांना पेढे, बर्फी, गुलाबजामुन, जिलेबी आणि लाडू तयार करण्यासाठी अधिक खर्च करावा लागू शकतो. त्यामुळे वाढता खर्च ग्राहकांकडून वसूल करण्यासाठी या पदार्थांच्या विक्री किमती वाढवण्याची वेळ दुकानदारांवर येऊ शकते.






