Weather Forecast | गेल्या काही दिवसांपासून हवामान विभागाने (IMD) दिलेल्या यलो अलर्टनंतर पश्चिम महाराष्ट्रात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग, गोवा, मिरज, सांगली आणि सातारा परिसरात जोरदार पावसासह वादळी वारे आणि विजांचा कडकडाट यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी महत्त्वाचा इशारा जारी केला आहे.
दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण-
महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागांमध्ये ढगाळ हवामान कायम राहणार असून, सांगली (Sangli) आणि सोलापूर (Solapur) जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा व सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात तापमान वाढण्याची शक्यता आहे.
पावसामुळे अनेक (Weather Forecast) भागांत विजेचा लपंडाव सुरू असून, काही ठिकाणी वाहतूक व्यवस्थाही कोलमडली आहे. मात्र, आगामी २४ तासांत हवामानात काही प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दक्षिण भारतात पावसाच्या हलक्या सरी-
हवामान विभागाच्या (Weather Forecast) माहितीनुसार, छत्तीसगड आणि कर्नाटकमधून जाणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. मुंबई, ठाणे, पालघरसारख्या भागांत उष्म्याची तीव्रता वाढली असून, नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
दक्षिण भारतात हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असून, देशभरात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पश्चिमी झंझावातामुळे हिमवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एप्रिल व मे महिन्यांत उष्णतेचा आणखी जोर वाढणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.






