Uddhav Thackeray | मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या शिवसेना (UBT) (Shiv Sena (UBT)) आणि मनसे (MNS) यांचा ऐतिहासिक संयुक्त मेळावा आज मुंबईतील (Mumbai) वरळी डोम येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाषण करत, तमाम मराठी जनतेला एकजुटीचा संदेश दिला आणि विरोधकांवर जोरदार टीका केली.
विरोधकांवर जोरदार टीका-
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या भाषणात दिल्लीतील नेतृत्वाला शरण जाणाऱ्यांवर टीका केली. “जो दिल्लीचे पाय चाटतो त्याला बाटगे म्हणतात,” असे म्हणत त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून दिली. “स.का. पाटलांसारखे (S. K. Patil) नेते मुंबई महाराष्ट्राला द्यायला तयार नव्हते, पण मराठी माणसाने त्यांना झुकवले,” असे ते म्हणाले. केंद्राच्या ‘एक देश, एक निवडणूक’ धोरणावर टीका करताना त्यांनी शिवसेनेने कलम ३७० हटवण्यासाठी दिलेल्या पाठिंब्याची आठवण करून दिली, पण ‘एक देश, एक भाषा’ म्हणून हिंदीची सक्ती कदापि मान्य करणार नाही, असे ठणकावले.
आपले सरकार का पाडले, असा सवाल विचारत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर घणाघाती हल्ला केला. “मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात मराठीची सक्ती केली, याचा मला अभिमान आहे. पण काही मराठीचे दुश्मन या निर्णयाविरोधात न्यायालयात गेले. तुम्ही गद्दारी करून आमचे सरकार पाडले, कारण तुम्हाला दिल्लीतील तुमच्या मालकांचे बूट चाटायचे होते,” असा थेट आरोप त्यांनी केला. गेल्या १४ वर्षांत मराठी माणसाला आणि उद्योगांना मुंबईबाहेर घालवण्याचे काम याच लोकांनी केले, असेही ते म्हणाले.
‘म’ मराठीचा नाही, तर महापालिकेचा-
ठाकरे (Uddhav Thackeray) बंधूंच्या या एकजुटीवर होणाऱ्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. “काही जण म्हणतात की आमचा ‘म’ मराठीचा नाही, तर महापालिकेचा आहे. पण आम्ही ‘म’ म्हणजे महाराष्ट्रही काबीज करू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाषणाच्या शेवटी त्यांनी मराठी माणसाला एक भावनिक आवाहन केले. “आपली ताकद एकजुटीत हवी. आपण प्रत्येक संकटात एकत्र येतो आणि संकट टळल्यावर आपापसात भांडतो. आता हा नतद्रष्टपणा करायचा नाही. कायम एकजूट राहा,” असे ते म्हणाले.






