Daund Yawat Tension | पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला असून, त्याचे पडसाद संपूर्ण परिसरात उमटत आहेत. एका तरुणाने व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे तणाव वाढला असून, गावात दगडफेक व जाळपोळ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
गावात कालपासून तणावाचे वातावरण आहे. शुक्रवारी सकाळपासून दोन गट एकमेकांवर दगडफेक करत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पुणे पोलिसांची विशेष तुकडी घटनास्थळी दाखल झाली असून, परिसरात सतत गस्त सुरू आहे. (Daund Yawat Tension)
राजकीय नेत्यांचा सहभाग, तर स्थानिकांचा संताप :
या घटनेच्या पार्श्वभूमीवर काल काढण्यात आलेल्या मोर्चात आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) आणि संग्राम जगताप (Sangram jagtap) उपस्थित होते. मात्र, या उपस्थितीमुळे तणाव शांत होण्याऐवजी वातावरण अधिक तापल्याचे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी वाहनांची आणि मालमत्तेची जाळपोळ झाल्याचीही माहिती आहे.
दौंडचे आमदार राहुल कूल यांनी सांगितले की, “गेल्या दोन-तीन दिवसांपासून यवतमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. प्रशासनाकडून शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.” तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली. “ज्या भागांमध्ये कधी जातीय तणाव झाले नाहीत तिथे आता हेतूपुरस्सर अशांतता पसरवली जाते आहे. राजकीय हितासाठी महाराष्ट्राचं सामाजिक संतुलन बिघडवलं जातंय, हे निंदनीय आहे,” असे त्यांनी म्हटले.
Daund Yawat Tension |स्थानिकांचा आरोप – “बाहेरून आलेल्यांमुळे परिस्थिती बिघडली” :
यवतमधील काही ग्रामस्थांनी सांगितले की, व्हॉट्सअॅपवरील पोस्ट हे वादाचे मूळ ठरले. परंतु परिस्थिती अधिक बिघडण्यामागे काही बाहेरून आलेल्या लोकांचा हात असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे. “मतांच्या लालसेपोटी बाहेरून आलेल्यांना पाठीशी घालू नका,” असा स्पष्ट इशाराही काहींनी दिला.
स्थानिक नेत्यांनी समजूत काढल्यानंतर काही नागरिकांनी घरात परत जाणं पसंत केलं, त्यामुळे आता हळूहळू शांततेकडे वाटचाल सुरू आहे. प्रशासन आणि पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू असून, गावात अजूनही तणावपूर्ण शांतता आहे.






