Suresh Dhas |भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आपल्या राजकीय विरोधकांवर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) टोळीच्या सदस्यांना विमानाने मुंबईत (Mumbai) आणून आपली हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता, असा दावा सुरेश धस यांनी केला आहे. एका विशिष्ट समाजाला भडकावून आपल्या विरोधात करण्यासाठी हरणाच्या मांसाचा (Deer Meat) बनाव रचण्यात आल्याचेही ते म्हणाले.
बिश्नोई गँगचा वापर करण्याचा कट
बीडमधील (Beed) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येनंतर आक्रमक भूमिका घेणारे आमदार सुरेश धस गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. तसेच, त्यांचा निकटवर्तीय सतीश भोसले उर्फ खोक्या (Satish Bhosle aka Khokya) याच्यावर हरणाची शिकार केल्याचा आरोप झाल्यानंतर धस यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका झाली होती. या आरोपांना उत्तर देताना धस यांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे. ते म्हणाले, “खोक्याच्या प्रकरणात मला जाणूनबुजून अडकवण्याचा मोठा प्रयत्न करण्यात आला.”
धस यांनी पुढे आरोप केला की, “मी हरणांचं मांस खातो, म्हणून खोक्याने शिकार केलेल्या हरणांचं मांस तो मला पुरवत होता, अशी राळ उठवली गेली. बिश्नोई (Bishnoi) समाजात हरणाला देवाचा दर्जा दिला जातो. आणि या सगळ्या प्रकरणात मला व्हिलन बनवलं गेलं. कारण बिश्नोई गॅंगच्या हातून माझा खून घडवून आणायचा होता.” त्यांनी हे आरोप फेटाळून लावले. “१६ वर्षे मी माळकरी राहिलेला माणूस आहे. माझ्या आयुष्यात हरणाच्या मांसापर्यंत मी कधीच गेलो नाही. मी पशू-पक्ष्यांवर प्रेम करणारा माणूस आहे. मला काय माहिती खोक्याच्या घरात काय सापडलं,” असे म्हणत त्यांनी स्वतःचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले.
विरोधकांवर थेट आरोप
सुरेश धस यांनी आपल्या राजकीय विरोधकांवर थेट हल्ला चढवला. ते म्हणाले, “बिश्नोई समाजाची तीन ते चार लोकं विमानाची तिकीटं फाडून जर मुंबईत आणत असाल, आणि त्यांना जर खोक्याने मला हरणाचे मांस पुरवल्याविषयी सांगत असाल तर, मला जीवातून उठवण्यापर्यंत तुम्ही गेलातच ना. म्हणजे लॉरेन्स बिश्नोईनं माझा खून केला पाहिजे. इतक्या खालच्या थराला जर तुम्ही जात असाल तर तुमच्याबरोबर मैत्री काय कामायची.”
इतके दिवस आपण यावर बोललो नव्हतो, पण आता ही बाब राज्याच्या मुख्यमंत्र्यांना (Chief Minister) सांगणार असल्याचेही सुरेश धस यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या खळबळजनक दाव्यामुळे बीडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, या आरोपांची आता सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे.






