Satara Floods | सातारा जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा, कोयना, वेण्णा आणि उरमोडी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. परिणामी सातारा, महाबळेश्वर, पाटण आणि वाई तालुक्यातील 350 हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. आतापर्यंत राज्यभरात 21 जणांचा मृत्यू, 10 जखमी आणि 14 लाख एकर शेती पाण्याखाली गेल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. NDRF आणि SDRF सह सर्व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्कतेवर आहेत.
धरणांचा विसर्ग वाढला, पूल आणि बंधारे पाण्याखाली :
कोयना धरण जलदगतीने भरल्याने सर्व दरवाजे 13 फूटांनी उघडण्यात आले असून तब्बल 95 हजार 300 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण 102 टक्के क्षमतेने भरले आहे. त्यामुळे तांबवे आणि निसरे येथील बंधारे तसेच संगमनगर धक्का पूल आणि मुळगाव पूल पाण्याखाली गेले आहेत. (Satara Floods)
इतर धरणांमधूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे:
कण्हेर धरण – 14,876 क्यूसेक
उरमोडी धरण – 8,900 क्यूसेक
वीर धरण – 55,800 क्यूसेक
धोम धरण – 17,000 क्यूसेक
यामुळे नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून रस्ते बंद करण्यात आले आहेत.
Satara Floods | गावांवर संकट, सांगलीला धोका :
पाटण तालुक्यातील 53 कुटुंबांतील 253 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. गुहागरमधील 150 प्रवासी अडकले होते, त्यांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. कराड-चिपळूण मार्ग पाण्यामुळे बंद करण्यात आला आहे. कराडच्या प्रीतीसंगम परिसरातील कृष्णामाई मंदिरात पाणी घुसलं आहे.
प्रशासनाने इशारा दिला आहे की, पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास पाटण, कराड आणि सांगली जिल्ह्यात महापुराचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आणि नदीकाठापासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. (Satara Floods)
हवामान विभागाचा अंदाज :
पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात अचानक पावसाची तीव्रता वाढली होती. मात्र आता हे क्षेत्र पुढे सरकत असल्याने पावसाचा जोर हळूहळू कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तरीही सातारा आणि सांगली जिल्ह्यात पुढील काही तास महत्त्वाचे ठरणार आहेत.






