Santosh Dhuri | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आक्रमक नेते आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी अखेर मनसेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशानंतर संतोष धुरी (Santosh Dhuri) यांनी मनसेतील अंतर्गत घडामोडींबाबत अनेक गंभीर खुलासे केले आहेत. विशेषतः राज ठाकरे, पक्षाची भूमिका आणि युतीच्या निर्णयावर त्यांनी थेट टीका केली आहे.
भाजपात प्रवेश करताच संतोष धुरी यांनी मनसे सोडण्यामागील कारणे स्पष्ट केली. २००७ पासून राज ठाकरेंसोबत केलेल्या संघर्षाची आठवण करून देत त्यांनी आपण सुरुवातीला शिवसेना, नंतर मनसेत काम केल्याचे सांगितले. आमचे रक्त भगवे आहे, मात्र पक्षाने घेतलेल्या अलीकडच्या राजकीय भूमिकेमुळे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते दुखावले गेले, असा दावा त्यांनी केला. (MNS Internal Politics)
‘पक्षाचा ताबा दुसऱ्यांच्या हातात, मनसे सरेंडर’ :
संतोष धुरी यांनी राज ठाकरेंवर गंभीर आरोप करत सांगितले की, ज्या लोकांनी पूर्वी वेगळा पक्ष स्थापन केला, त्यांनाच पुन्हा जवळ केले गेले. या लोकांकडे पक्षाचा संपूर्ण ताबा देण्यात आला असून, साहेबांनीच पक्ष सरेंडर केला असल्याचा आरोप त्यांनी केला. युती करताना मनसेच्या मूळ विचारधारेचा बळी गेला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी धुरी यांनी जागावाटपावरही नाराजी व्यक्त केली. आम्हाला दिलेल्या ५२ जागा केवळ कागदावर आहेत, प्रत्यक्षात त्यातील काहीच जागा निवडून येण्यासारख्या असल्याचा दावा त्यांनी केला. मराठी मतदार जास्त असलेल्या माहीम, दादर, वरळी, शिवडी, भांडूप अशा भागांत अपेक्षित जागा न मिळाल्याने मनसेला दुय्यम वागणूक दिली गेल्याचे ते म्हणाले.
Santosh Dhuri | वांद्र्यात तह, दोन ‘किल्ले’ सरेंडर केल्याचा आरोप :
संतोष धुरी यांनी वांद्र्यातील तहाचा उल्लेख करत आणखी खळबळजनक आरोप केले. कोणतीही चर्चा न करता वरूनच निर्णय लादण्यात आले. साहेबांनी दोन किल्ले सरेंडर केले, एक संतोष धुरी आणि दुसरा संदीप देशपांडे, असा संदेश देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. हे सर्व निर्णय वांद्र्यातील बंगल्यावरून ठरवण्यात आले, असेही ते म्हणाले. (Raj Thackeray Allegations)
आपल्याला कुठेही स्थान दिले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश मिळाल्यानंतर पक्षात राहण्यात अर्थ नसल्याची भावना निर्माण झाली, असे धुरी यांनी सांगितले. संदीप देशपांडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपण स्वतःचा निर्णय घेत भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनसेतील ही अंतर्गत अस्वस्थता आता उघडपणे समोर आल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण येण्याची शक्यता आहे.






