Sanchita Ugale | मराठमोळी अभिनेत्री संचिता उगले (Sanchita Ugale) हिच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रासह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. 14 जून रोजी तिने राहत्या घरी गळफास घेत ji माहिती समोर आली. या घटनेनंतर तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, तिचा भाऊ आकाशने केलेल्या विधानांमुळे या प्रकरणाची अधिक चर्चा सुरू झाली आहे.
भावाचा दावा काय? :
रविवारी रात्री घडलेल्या या घटनेत 22 वर्षीय संचिता हिचा मृतदेह घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना नालासोपारा (Nalasopara) येथील अचोले गाव (Achole Village) परिसरात घडली. प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी 7 ते 7.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
संचिताच्या भावाने माध्यमांशी संवाद साधताना तिच्या मृत्यूचा संबंध अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांच्या प्रकरणाशी जोडला. त्याच्या म्हणण्यानुसार, ज्या प्रकारे सुशांतवर मनोरंजन क्षेत्रातील ताण वाढत गेला, त्याचप्रमाणे संचितालाही कामाच्या ठिकाणी प्रचंड दबावाचा सामना करावा लागत होता. याच मानसिक तणावामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा त्याने केला आहे.
Sanchita Ugale | 14 जून आणि शेवटची सोशल मीडिया पोस्ट :
आकाशने आणखी एक महत्त्वाची बाब समोर आणताना सांगितले की, संचिताने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलेली शेवटची पोस्ट ही सुशांत सिंह राजपूत यांच्याशी संबंधित होती. तिने इन्स्टाग्रामवर एक रील शेअर करत 14 जून हा सुशांत यांच्या पुण्यतिथीचा दिवस असल्याचा उल्लेख केला होता.
आकाशच्या मते, 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूत यांनी आत्महत्या केली होती आणि त्यामागे चित्रपटसृष्टीतील तणाव कारणीभूत असल्याचे अनेकदा बोलले गेले. सहा वर्षांनंतर नेमक्या त्याच दिवशी त्याची बहीण संचिता हिनेही आत्महत्या केल्याने हा केवळ योगायोग आहे की त्यामागे अन्य काही कारणे आहेत, असा प्रश्न त्याने उपस्थित केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करत त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, असे आवाहन केले आहे.






