Sadabhau Khot | राज्यातील गोरक्षकांवर थेट हल्लाबोल करत महायुतीचे आमदार आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी संताप व्यक्त केला आहे. सांगोला येथे शेतकऱ्यांच्या मोर्चात बोलताना त्यांनी गोरक्षकांवर जोरदार टीका केली. यावेळी भाषण करताना त्यांच्या तोंडून गावरान भाषेत इशारा देताना शब्द घसरल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अलीकडेच सांगोला परिसरात जर्सी आणि पोस्टन भाकड गाई कत्तलखान्यांना पाठवण्याला गोरक्षकांकडून विरोध करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी भाषण करताना त्यांनी शेतकऱ्यांचा इतिहास मांडत गोरक्षकांना थेट इशारा दिला.
“धमक्या कोणाला देता?” – खोतांचा संताप :
सदाभाऊ खोत म्हणाले, “शेतकऱ्याने कधीही खिलार किंवा देशी गाईची बाजारात विक्री केलेली नाही. हजारो वर्षांचा हा इतिहास आहे. मात्र, लोकांनी गाड्या अडवायला सुरुवात केली तेव्हा मी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिलो. त्यानंतर मला धमक्या यायला लागल्या. अरे धमक्या कोणाला देता? शेतकऱ्यांच्या पोराला म्हणून मी नांगराचा फाळ आणलाय. माझ्या वाटेला आलात तर…” असे शब्द उच्चारून त्यांनी गोरक्षकांना इशारा दिला.
दरम्यान, आता त्यांच्या या वक्तव्यादरम्यान जीभ घसरल्याने त्यावरून मोठी चर्चा रंगली आहे. (Sadabhau Khot)
Sadabhau Khot | गोरक्षकांवर खंडणीखोरीचे आरोप :
या मोर्चात बोलताना खोत यांनी गोरक्षकांवर गंभीर आरोपही केले. “गोरक्षक हे खरोखर रक्षक नाहीत, तर भक्षक आहेत. ते शेतकऱ्यांना खंडणी लावतात, त्रास देतात,” असा आरोप त्यांनी केला.
याचबरोबर, गोरक्षकांच्या विरोधात ‘गोपालक सेना’ उभी करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. “राज्यातील गोधन हे गोशाळा नव्हे तर शेतकरी सांभाळतो. पण गोरक्षकांच्या नावाखाली शेतकऱ्यांना त्रास होतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी नवा संघ उभारला जाईल,” असे खोत म्हणाले.






