India Pakistan War l भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सध्या शिगेला पोहोचला असतानाच भारतासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर एक मोठी सकारात्मक घडामोड समोर आली आहे. जगातील महाशक्ती रशियाने थेट भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून भारताला पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले आहे. रशियाच्या या भूमिकेमुळे भारताचे जागतिक राजकारणात बळ वाढले असून, पाकिस्तानला कडवा झटका बसला आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानविरोधात विविध स्तरांवर कारवाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी पंतप्रधान मोदींशी संवाद साधून दहशतवादाविरोधातील लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा देण्याची ग्वाही दिली आहे. हा पाठिंबा भारताच्या धोरणात्मक विजयाप्रमाणेच मानला जातो.
रशियाचा ऐतिहासिक पाठिंबा, पाकिस्तानला जागतिक स्तरावर अपमान :
रशिया आणि भारत यांचं दीर्घकाळचं सामरिक आणि राजनैतिक नातं कायम राहिलं आहे. 1971 साली भारत-पाकिस्तान युद्धातही रशिया भारताच्या बाजूने ठाम उभा राहिला होता. आता पुन्हा एकदा त्या मैत्रीची झलक पाहायला मिळतेय. विशेष म्हणजे पाकिस्ताननं रशियाकडे मदतीसाठी आवाहन केलं होतं, मात्र रशियाने हे आवाहन झिडकारलं आणि भारताच्या बाजूने उभं राहिलं.
पुतीन यांनी पहलगाम हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत मृत पावलेल्यांप्रती शोक व्यक्त केला. “हल्लेखोर आणि त्यांना समर्थन देणाऱ्यांना न्यायाच्या कक्षेत आणलं पाहिजे,” असं वक्तव्य करून रशियाने दहशतवादाविरोधातील भारताच्या लढ्याला न्याय दिला आहे.
India Pakistan War l भारताला जागतिक पातळीवर बळ, पाकिस्तानची कोंडी सुरू :
भारताकडे आधीच अमेरिका, फ्रान्स, जपानसारख्या देशांचा अप्रत्यक्ष पाठिंबा आहे, आणि आता रशियासारख्या महाशक्तीचा थेट पाठिंबा मिळणं म्हणजे पाकिस्तानसाठी मोठा राजनैतिक अपमान आहे. जागतिक स्तरावर दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्या देशांविरोधात भारताचं मत आता अधिक प्रभावीपणे ऐकले जाईल.
रशियाच्या या पावलामुळे भारताची राजनैतिक, लष्करी आणि आंतरराष्ट्रीय विश्वासार्हता वाढणार आहे, तर पाकिस्तानची कोंडी अधिक मजबूत होणार आहे. आगामी काळात भारताचे परराष्ट्र धोरण आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.






