Ranjit Kasale | बीडमधील पोलीस उपनिरीक्षकाच्या निलंबनामुळे वादाचा मोठा भडका उडाल्याचं चित्र आहे. निलंबित होताच रणजित कासले (Ranjit Kasale) यांनी व्हिडीओद्वारे गंभीर आरोप करत वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निशाणा साधला. त्यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) व वाल्मिक कराड (Valmik Karad) यांच्या आर्थिक व्यवहारांबाबतही मोठे गौप्यस्फोट केले आहेत.
निलंबनानंतर सोशल मीडियावर गंभीर आरोप
बीड पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी बुधवारी रणजित कासले यांचे निलंबन जाहीर करत आदेश दिला. निलंबनाच्या काही वेळातच संतप्त कासले यांनी सोशल मीडियावर एकामागून एक व्हिडीओ शेअर करत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर तसेच गुजरातमधील एका बिल्डरवर गंभीर आरोप केले. कासले यांनी या व्हिडीओत धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांची नावे घेत तपासाची मागणी केली आहे.
पाच महिन्यांपूर्वी नियंत्रण कक्षातून सायबर विभागात आलेल्या कासले यांच्याकडे परराज्यातील सायबर गुन्ह्यांची चौकशी सोपवण्यात आली होती. मात्र, आर्थिक व्यवहारात अनियमितता केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. ही माहिती वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच तपास सुरू झाला आणि त्यातून दोषी ठरल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. यानंतर कासले यांनी समाजमाध्यमांवर आरोपांची मालिका सुरू केली.
दारू पिऊन केलेले आरोप आणि निवडणुकीत गाड्या पकडल्याचा दावा
व्हिडीओद्वारे कासले यांनी स्वतः मद्यपान केल्याची कबुली दिली असून, त्यात त्यांनी म्हटले की दारू पिल्यावर माणूस सत्य बोलतो आणि त्यामुळं आपणही खरी माहिती उघड करत आहोत. एका महिलेच्या सांगण्यावरून, बिल्डर आणि त्याच्या पत्नीने आपल्याला टार्गेट केले आणि त्यांच्या संमतीनेच निलंबन करण्यात आले, असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच आपल्या कुटुंबीयांना त्रास न देता, स्वतःकडे असलेले पुरावे लवकरच लोकांसमोर मांडण्याचा इशारा त्यांनी दिला.
विधानसभा निवडणुकीदरम्यान, परळीत बंदोबस्तात असताना कासले यांनी धनंजय मुंडे व वाल्मिक कराडच्या पैशाच्या गाड्या थांबवून तपासल्या, यामुळेच त्यांच्यावर रोष निर्माण झाला होता, असे त्यांनी म्हटले. त्या दिवशी गाड्या तपासल्या गेल्याने पुढील दिवशी त्यांना बंदोबस्तावरून हटवण्यात आले. त्याच दिवशी त्यांच्या खात्यात संत बाळूमामा कन्स्ट्रक्शनकडून 10 लाख रुपये जमा झाल्याचे त्यांनी सांगितले. हा पैसा कोणत्या कारणासाठी आला याचा तपास करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहमंत्र्यांकडे केली आहे.






