Ramdas Kadam | ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधीमंडळात राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh kadam) यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची डान्स बारशी जोडलेली भूमिका उघड करत गंभीर आरोप केले. मात्र या आरोपांवर रामदास कदम यांनी जोरदार पलटवार करत सर्व आरोप फेटाळले आहेत. “वर्षा बंगला सोडल्यावर टोपलीभर लिंबं सापडली, मग जादूटोण्याचा आरोप कोणावर करायचा?” असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
रामदास कदम म्हणाले की, “अनिल परब अर्धवट वकील आहेत. ते त्यांच्या मालकाला खुश करण्यासाठीच हे आरोप करत आहेत. त्यांनी चुकीच्या नियमांचा हवाला देत विधीमंडळाची दिशाभूल केली आहे. त्यामुळे मी विधानसभा अध्यक्षांकडे याबाबत तक्रार करणार आहे.”
“सावली डान्स बार नाही, व्यवसाय कायदेशीर” :
रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी स्पष्ट केलं की, सावली बार हा 1990 पासून त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे आणि तो बार गेल्या 30 वर्षांपासून शेट्टी नावाच्या व्यक्तीला चालवायला दिला आहे. “त्या ठिकाणी डान्स बार नाही, केवळ ऑर्केस्ट्रा व 14 वेटर महिलांची परवानगी आहे. दोन महिन्यांपूर्वी एका घटनेनंतर आम्ही ती जागा बंद केली असून संबंधित व्यक्तीवर कारवाई देखील केली आहे,” असं कदम यांनी सांगितलं.
“परब यांनी आमच्यावर डान्स बार चालवण्याचा खोटा आरोप करून आमची बदनामी केली आहे,” असा गंभीर आरोप करत कदम यांनी सांगितलं की, जर माझ्या पत्नीला अडचणीत टाकायचं असेल तर नियम बदलावे लागतील, नियमबाह्य पद्धतीने आम्हाला लक्ष्य करता येणार नाही.
Ramdas Kadam | “उद्धव ठाकरेंच जादूटोणा करत असावेत” :
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाला 50 जागा मिळाल्या यावर उद्धव ठाकरे यांनी ‘जादूटोणा’चा आरोप केला होता. यावर प्रत्युत्तर देताना रामदास कदम म्हणाले, “ज्यांना काविळ झाली आहे, त्यांना सगळं पिवळं वाटतं. ते मातोश्रीवर बसून जर खरंच जादूटोणा करत असतील, तर सगळीकडे त्यांना जादूच दिसणार.”
कदम पुढे म्हणाले, “जेव्हा उद्धव ठाकरे वर्षा बंगला सोडून गेले, तेव्हा तिथे टोपलीभर लिंबं सापडली होती. मग खरं जादूटोणा कोण करतंय? स्वतःच जादूटोणा करून इतरांवर आरोप करणं ही हास्यास्पद गोष्ट आहे.”






