Raj Thackeray | शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात सहभागी होत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्र सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. मराठी भाषा, भूमी, उद्योगधंदे आणि सांस्कृतिक अस्मिता या मुद्द्यांवर त्यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “तुमच्या कृतीतून महाराष्ट्राला नख लागतंय हे समजल्यावर आम्ही अंगावरच येऊ,” अशा शब्दांत सरकारला थेट इशारा दिला.
राज ठाकरे म्हणाले की, “जमिनी निघून जातायत, भाषा गमावण्याची वेळ येतेय आणि हे सर्व घडत असताना तुम्ही कान बंद, डोळे बंद ठेवलेत तर पश्चातापाशिवाय काही उरणार नाही.” त्यांनी उपस्थितांना आवाहन केलं की, “आजूबाजूला काय सुरू आहे हे समजून घ्या. सावध राहा, कारण इथं सर्व विकलं जातंय.”
गुजराती साहित्य संमेलनावरून सरकारवर घणाघात :
राज ठाकरेंनी आपल्या भाषणात महाराष्ट्र सरकारने आयोजित केलेल्या गुजराती साहित्य संमेलनावर टीका केली. “महाराष्ट्रात स्वतः गुजराती साहित्य संमेलन आयोजित करणं म्हणजे केवळ प्रेम नाही, तर मराठी-गुजराती समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न आहे,” असा आरोप त्यांनी केला. (Raj Thackeray Latest News)
“व्यापारी लोकांच्या चोपड्यांतून आता पुस्तकांच्या चोपड्यांत लक्ष गेलं तर बरं, पण ही योजना केवळ साहित्याची नाही – ती राजकीय हेतूने आखलेली आहे,” असं म्हणत त्यांनी सरकारवर मतांसाठी खेळी करण्याचा आरोप केला. (Raj Thackeray)
Raj Thackeray | ‘शेकाप’चे कौतुक, जयंत पाटलांवर विश्वास :
राज ठाकरे म्हणाले की, “मी दुसऱ्यांदा शेकापच्या कार्यक्रमाला आलो आहे. ही चळवळ शुद्ध राजकीय असून भूमीशी जोडलेली आहे.” त्यांनी जयंत पाटील (Jayant patil) यांना रायगडची जबाबदारी घेण्याचं आवाहन केलं आणि या चळवळीला आपला पाठिंबा असल्याचंही स्पष्ट केलं.
ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्राच्या विरोधात कुणीही जाईल, तर आम्ही गप्प बसणार नाही. सरकार काही का करेल याची आम्ही वाट बघत बसणार नाही. जे हवं ते आम्हीच करणार आणि वेळ आली, तर अंगावर येऊ.” असं ते म्हणाले आहेत.






