Maharashtra Weather Update | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढत असताना वातावरणात पुन्हा एकदा मोठा बदल दिसून येतोय. कडाक्याच्या थंडीनंतर आता भारतीय हवामान विभागाने राज्यासाठी थेट पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यात सध्या पावसाला अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झाली असून काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. (Maharashtra Weather Update)
दिवसेंदिवस तापमान घसरत असून पुण्यासह (Pune) अनेक शहरांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तर दिशेकडून येणारे थंडगार वारे आणि वातावरणातील ओलाव्यामुळे काही भागात तापमान 10 अंशांखाली गेलं आहे. मात्र आता अचानक हवेतला गारवा काहीसा कमी होत असून तापमानात हलकी वाढ होताना दिसतेय. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्गमध्ये अलर्ट :
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण, थंडी आणि ओलाव्याचा संगम झाल्याने या भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील अनेक भागांत तापमानात विक्रमी घट नोंदवली गेली आहे. धुळे जिल्ह्यात तब्बल 7.5 अंश सेल्सिअस इतकं निचांकी तापमान नोंदवण्यात आलं असून राज्यातील सर्वात कमी तापमान असलेला जिल्हा म्हणून धुळे अग्रेसर राहिला. परभणी, निफाड, पुणे, महाबळेश्वर आणि आहिल्यानगर येथेही तापमान 8 ते 11 अंशांच्या दरम्यान नोंदवण्यात आले आहे.
Maharashtra Weather Update | गुलाबी थंडीमध्ये पावसाची भर :
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार गारवा जाणवत होता. तापमान 10 अंशांच्या खाली गेल्यानंतर पुणेकरांनी अक्षरशः हिवाळ्याचा पूर्ण आनंद घेतलाय. मजेशीर बाब म्हणजे सारसबाग येथील गणपती बाप्पालादेखील नेहमीप्रमाणे यंदाही लोकरचा स्वेटर आणि कानटोपी घालण्यात आली असून ही परंपरा दरवर्षी कायम ठेवली जाते. (Maharashtra Weather Update)
मात्र आता ढगाळ वातावरणामुळे पुन्हा एकदा पावसाची शक्यता वाढली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील दोन दिवस हवामान ढगाळ राहणार असून काही भागात पावसाची शक्यता कायम आहे. अचानक हवामान बदलामुळे शेतकरी आणि नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.






