Rain Alert | देशातील हवामानात गेल्या दोन दिवसांत मोठे बदल दिसून आले असून, त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रासह अनेक राज्यांवर होताना दिसतो आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ चक्रीवादळामुळे (Rain Alert) वाऱ्यांची दिशा बदलली असून, त्याचा प्रभाव महाराष्ट्रातील हवामानावरही दिसून येतो आहे.
रायगडमध्ये यलो अलर्ट-
पुढील ४८ तासांत म्हणजेच १८ मेपर्यंत रायगड (Raigad) जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या कालावधीत ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे. नागरिकांनी विजा चमकत असताना घराबाहेर पडू नये, मोबाईलचा वापर टाळावा, आणि इलेक्ट्रिक उपकरणांपासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
यासोबतच पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बांगलादेशातही ‘शक्ती’ चक्रीवादळामुळे जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकण व मध्य महाराष्ट्रात पूर्वमोसमी वारे आणि वळवाच्या पावसाचा प्रभाव जाणवतो आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे.
मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसाची झड-
सध्या मे महिन्यात(Rain Alert) उन्हाळ्याऐवजी वळवाच्या पावसाचा अनुभव महाराष्ट्रभर घेतला जात आहे. मुंबई शहर, उपनगर आणि इतर अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. हवामान खात्यानं पुढील ३-४ आठवड्यांसाठी सरासरीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवला असून, प्रत्यक्ष मान्सून दाखल होईपर्यंत विजा, ढगगर्जना आणि पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
अरबी समुद्र आणि तेलंगणा भागात वाऱ्यांची चक्राकार गती निर्माण झाल्यामुळे राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. १५ ते २२ मेदरम्यान सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक राहील.






